कांदा रोपांसह बियाणांचे दर भिडले गगनाला
रोहन मुजूमदार
पुणे – पुणे जिल्ह्यात प्रतिकूल स्थितीमुळे खरिपातील कांदा रोपवाटिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे कांदा रोपांचे दर गगनाला भिडल्याने लागवडीचे नियोजन काही ठिकाणी कोलमडले असल्याने यंदा लागवड कमी होण्याची भीती व्यक्त होत आहे. दुसरीकडे रब्बीत लागवडीच्या कांद्याचे बियाणेदेखील महागले आहे. प्रतिकिलो सुमारे 3 हजार रुपयांपर्यंत दर कांदा बियाणांचे आहेत. दरम्यान, आधी गडगडले भाव नंतर करोना व लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांना पुन्हा “शॉक’ बसला असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
पुणे जिल्ह्यात खरीप कांद्याचे सरासरी 3 हजार 370 हेक्टर, उशीरा (लेट) खरीप कांद्याचे 11 हजार 839 हेक्टर, तर रब्बी (उन्हाळी) कांद्याचे 18 हजार 926 हेक्टर क्षेत्र मानले जाते. यात सर्वाधिक पुरंदर, जुन्नर, खेड, शिरूर आदी तालुक्यांमध्ये उत्पादन घेतले जाते. रोपवाटिका मे महिन्याच्या अखेरीस व जूनच्या सुरुवातीला तयार करण्यास शेतकऱ्यांनी सुरुवात केली; परंतु जून व जुलैमध्ये तीव्र उन्हामुळे नुकसान झाले. तर त्यानंतर अतिजोरदार पावसाने पेरलेल्या बियाण्यांचे काहीसे नुकसानही अनेक भागात झाले. यामुळे कांदा रोपवाटिकांचे नुकसान झाले आहे. अनेक शेतकरी कांदा रोपे निर्मिती व विक्रीचा व्यवसाय करतात; मात्र यंदा कांदा लागवडीसाठी हवी तशी व पुरेशी रोपे मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
लागवडीकडे कल वाढला
कांद्याला जीवनावश्यक वस्तू कायद्यातून मुक्त केले आहे. तसेच नुकतीच हॉटेल्स, खानावळी सुरू झाल्या असून काही सुरू होत असल्याने कांद्याची मागणी वाढायला सुरुवात होणार आहे. कांद्याची वाढती मागणी लक्षात घेता भविष्यात कांद्याला चांगला भाव मिळण्याच्या आशेने अनेक शेतकरी कांदा लागवडीसाठी सरसावले आहेत. यामुळे कांदा रोपांचा तुडवडा पुणे जिल्ह्यात जाणवत आहे. तसेच कांदा लगवड परवडत नाही, त्यात पुढे दर वाढून टिकून राहतील का, हा देखील शेतकऱ्यांपुढे प्रश्न उभा ठाकला आहे.
बी पेरून कांदा लागवड
सध्या शेतीसाठी मजूर मिळणे अवघड झाल्याने अलीकडे बरेच शेतकरी रोपे तयार न करता थेट शेतात रानबांधणी करून त्यांमध्ये ‘बी’ फिसकटून पेरणी करतात. अशा प्रकारच्या पेरणी पद्धतीचा अवलंब वाढू लागला आहे. शेतकरी सरळ ‘बी’ पेरून कांदा लागवड करतात कारण दिवसेंदिवस मजुरांचा तुटवडा तसेच त्यांच्या रोजगाराची वाढ यामुळे लागवड खर्च वाढतो; परंतु या पद्धतीत बी कमी जास्त प्रमाणात पडते. अशा प्रकारे पेरणी केली तर विरळणी करून योग्य प्रमाणात रोपांची संख्या वाढवली जाते, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.