कर्मचाऱ्यांची नियुक्ती : रुग्ण आणि नातेवाईकांचा मनस्ताप कमी होणार
पुणे – ग्रामीण भागातील करोना संशयित किंवा बाधित व्यक्तीला तत्काळ आरोग्य सुविधा मिळावी, प्रशासन आणि नातेवाईक यांच्यात समन्वय असावा तसेच अत्यवस्थ बाधिताला शहरातील रुग्णालयात तत्काळ बेड उपलब्ध होवून उपचार मिळावे, यासाठी प्रत्येक रुग्णालयात 24 बाय 7 दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे करोना बाधिताला उपचार देण्यासाठी रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांना होणारा मनस्ताप कमी होणार आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागांत करोनाचा संसर्ग झापाट्याने वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर बाधित व्यक्तीला रुग्णालयात बेड उपलब्ध होणे, त्याचे ऍडमिशन आणि डिस्चार्ज तसेच अन्य व्यवस्थेसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या नियंत्रणाखाली “रुग्णालय व्यवस्था सनियंत्रण कक्ष’ स्थापन करण्यात आले.
ग्रामीण भागातील बाधित व्यक्तीला तालुक्यातच चांगले उपचार मिळावे यासाठी प्रत्येक तालुक्यात कोविड रुग्णालयात उभारले आहे. त्यानुसार संशयित व्यक्तींची तपासणी, सौम्य लक्षणे असलेल्यांना याठिकाणीच उपचार दिले जात आहे. अत्यवस्थ असेल तरच शहरातील किंवा जिल्हा परिषदेकडून उभारलेले बड्या रुग्णालयांमध्ये दाखल केले जात आहे.
बाधित व्यक्ती रुग्णालयात दाखल झाल्यापासून त्याला घरी सोडेपर्यंत रुग्णालय, जिल्हा परिषद, पंचाय समिती आणि रुग्णांचे नातेवाईक यांच्यात समन्वय ठेवणे आवश्यक आहे. त्यामध्ये करोना संशयिताची तपासणी करण्यापासून त्याच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. अहवाल निगेटिव्ह आल्यावर त्याला घरी सोडणे, बाधित असल्यास त्याची लक्षणे लक्षात घेऊन सेंटरमध्ये उपचार देणे, लक्षणे तीव्र असल्यास जिल्हा किंवा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करणे.
उपचार सुरू असताना, देखरेख करणे, नोंदी ठेवणे त्याचबरोबर जिल्हा परिषद आणि तालुका आरोग्य अधिकारी यांच्याशी समन्वय ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठीच प्रत्येक रुग्णालयात दोन कर्मचाऱ्यांची नेमणूक केल्याची माहिती सीईओ आयुष प्रसाद यांनी दिली. दरम्यान, नेमून दिलेल्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ रूजू व्हावे, असा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.