पुरंदर – राष्ट्रवादी कॉँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. माजी आमदार आणि खासदार सुप्रिया सुळे यांचे अत्यंत निकटचे सहकारी अशोक टेकवडे हे राष्ट्रवादीला राम-राम करत आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. यामुळे पुरंदरमध्ये राष्ट्रवादीला मोठं खिंडार पडलं आहे. टेकवडे हे पुरंदरमधील मोठं नाव असून ते 2004 ते 2009 मध्ये आमदार होते. मात्र त्यांनीच सोडचिठ्ठी दिल्याने आता राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत अशोक टेकवडे उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. बारामतीच्या विकासाठी भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचे टेकवडे यांनी म्हंटले आहे. अशोक टेकवडे गेल्या महिन्यांपासून राष्ट्रवादीत नाराज होते. त्यामुळे ते राष्ट्रवादीत फार काळ राहतील असं वाटत नव्हतं. लवकरच ते पक्ष सोडतील अशी पुरंदरमध्ये चर्चाही सुरू झाली होती. टेकवडे यांच्यामुळे आता भाजपला पुरंदरमध्ये मोठं बळ मिळाले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस हा कार्यकर्त्यांचा पक्ष राहिला नाही. तो पदाधिकाऱ्यांचा पक्ष झाला आहे, अशी टीकाही त्यांनी केली होती. अशोक टेकवडे हे पक्षातील काही पदाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होते. टेकवडे यांनी जिल्हाध्यक्षांना एक पत्र लिहिलं होतं.
त्यात त्यांनी पुरंदर तालुकाध्यक्षांची तक्रार करत गंभीर आरोप केले होते. तसेच अध्यक्ष बदलण्याची मागणीही केली होती. या लेटरबॉम्बची चांगलीच चर्चा झाली होती. मात्र, या पत्रावर काहीच कारवाई न झाल्याने टेकवडे नाराज झाले होते. त्या नाराजीतूनच त्यांनी अखेर पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. टेकवडे यांच्या पक्ष प्रवेशामुळे भाजपच्या मिशन बारामतीला मोठं यश मिळाले आहे.