मुंबई :, शिवसेना जे बोलते ते करते… अशी ग्वाही देत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी जाहिर केलेल्या पक्षाच्या वचननाम्यातून आश्वासनांची खैरात केली आहे. 10 रुपयांत सकस जेवण, एक रुपयात आरोग्य चाचणी, 300 युनिटपर्यंत विजेच्या दरात 30 टक्क्यांची कपात, ग्रामीण भागात विद्यार्थ्यांसाठी बससेवा आणि शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याबरोबरच दुर्बल घटकातील शेतकऱ्यांच्या खात्यावर दरवर्षी दहा हजार रुपये जमा करण्याचे आश्वासन वचननाम्यातून देण्यात आले आहे.
शिवसेनेच्या वचनाम्यातील घोषणा…
– आर्थिक दुर्बल कुटुंबातील मुलींचे महाविद्यालयीन शिक्षण विनामूल्य
– प्रत्येक जिह्यात बचत गट उत्पादनांच्या विक्रीसाठी जागा देणार
– शाळा, महाविद्यालयांत सॅनेटरी नॅपकिनसाठी व्हेंडिंग मशीन’
– शहरांत नोकरीसाठी येणाऱ्या महिलांसाठी होस्टेल सुविधा
– 15 लाख पदवीधर तरुणांना “युवा सरकार फेलो’मार्फत शिष्यवृत्ती
– रोजगाराभिमुख शिक्षण देणारी व्यवस्था
– 35 वर्षांखालील तरुणांना हक्काच्या घरासाठी म्हाडात 2 टक्के आरक्षण
– तालुका स्तरावर गाव ते शाळा, महाविद्यालयात पोहोचण्यासाठी 2500 विद्यार्थी एक्प्रेस’ बस
– दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण व स्वयंरोजगारासाठी शून्य टक्के व्याजदराने कर्ज
– गावाच्या प्रत्येक वाडीपर्यंत एम-60 म्हणजे सिमेंट खडीच्या मिश्रणाचे पांढऱ्या थराचे रस्ते
– मुंबई शहराप्रमाणे राज्यातील अन्य शहरांत एसटीच्या इलेक्ट्रिक बस
– एक रुपयात आरोग्य चाचण्यांसाठी “वन रूपी क्लिनिक’
मधुमेह, हृदयविकार यासह आरोग्याशी संबंधित 200 प्राथमिक चाचण्या ज्या आज सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. त्या सर्व चाचण्या एक रुपयात उपलब्ध करून दिल्या जातील. 10 रुपयांत चांगले सकस आणि स्वच्छ जेवण देण्यासाठी सेंट्रलाइज किचन व्यवस्था उभारण्यात येणार आहे. यासाठी बचत गटांचीही मदत घेतली जाणार आहे.
जाहीरनाम्यात सर्व घटकांचा विचार करण्यात आला असून आशासेविकांची मानधनवाढ, महिला, ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या योजनांचाही समावेश जाहीरनाम्यात करण्यात आला आहे. कशाचाही समतोल ढळणार नाही याचा विचार करूनच पूर्णपणे जबाबदारीने हा वचननामा तयार केला आहे. वचननामा असून ते वचन कसं पूर्ण करणार हे कौशल्य आमचं आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.