सातारा – जावळी तालुक्यातील बामणोली परिसरातील 40 ते 50 गावांमधील ग्रामस्थांचे उपजिविकेचे मुख्य साधन असलेल्या शिवसागर जलाशयातील बोटिंग व्यवसाय पुन्हा सुरू करावा, अशी मागणी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली. कोयना धरणाच्या सुरक्षेची काळजी घेऊन शासनाच्या निर्णयात सुधारणा करण्याबाबत सातारच्या जिल्हाधिकाऱ्यांनी अहवाल सादर करण्याची सूचना ना. पवार यांनी दिल्याने शिवसागरातील जलवाहतूक लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. कोयना धरणाच्या सुरक्षेच्या कारणास्तव येथील जलवाहतुकीवर गेल्या पाच वर्षांपासून शासनाने बंदी घातली होती.
यासंदर्भात ना. पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात नुकत्याच झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीस गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, आ. मकरंद पाटील, गृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता, जलसंपदा विभागाचे सचिव राजेंद्र पवार, अप्पर पोलीस महासंचालक मिलिंद भारंबे, सातारचे जिल्हाधिकारी शेखर सिंह उपस्थित होते. कोयना धरण क्षेत्राच्या जलवाहतूकीमध्ये पाटण, सातारा, जावळी आणि वाई तालुक्यातील गावांचा समावेश आहे.
शिवसागर जलाशयात सुमारे 55 वर्षे जलवाहतूक सुरू होती. मात्र, 2008 मध्ये मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर कोयना धरणाच्या सुरक्षेसाठी गेल्या पाच वर्षांपासून जलवाहतुकीवर बंदी होती. त्यामुळे बामणोली परिसरातील अनेकांवर उपासमारीची वेळ आली होती. आ. शिवेंद्रराजे यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी श्वेता सिंघल व पोलीस प्रमुखांसोबत बैठक घेऊन बोटिंगला तात्पुरती परवानगी मिळवून दिली होती. मात्र, शेकडो बोटचालकांना रितसर परवानगी मिळून त्यांचा पूर्वापार सुरू असलेला व्यवसाय कायदेशीर व्हावा, यासाठी आ. शिवेंद्रराजेंनी पाठपुरावा केला.
यासंदर्भात ना. पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आ. शिवेंद्रराजेंनी बामणोली परिसरातील लोकांच्या समस्या मांडल्या. जलवाहतूक बंद झाल्याने अनेक दुर्गम गावांचा दळणवळणाचा प्रश्न गंभीर बनला असून शेकडो कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली. वासोटा दर्शन व बामणोली पर्यटनावरही निर्बंध आले. त्यामुळे शिवसागर जलाशयातील बोटिंगला परवानगी मिळावी, अशी मागणी आ. शिवेंद्रराजे यांनी केली. त्यावर, याबाबत जिल्हा प्रशासनाने अहवाल सादर करावा.
अहवाल आल्यानंतर जलविद्युत प्रकल्प आणि सरकारी गोपनियता कायदा यात आवश्यक सुधारणा करून जलवाहतुकीला अधिकृत परवानगी द्यावी, अशा सूचना ना. पवार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. या निर्णयाचे बामणोली परिसरातील ग्रामस्थांनी स्वागत करून आ. शिवेंद्रराजे व ना. पवार यांचे आभार मानले.