Shivraj Singh Chauhan – मध्यप्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत भाजप सरकारला मोठा फटका बसणार असल्याचे संकेत अनेक सर्व्हेक्षणातून मिळाल्यानंतर आता भाजप श्रेष्ठींनी शिवराजसिंह चौहान (Shivrajsinh Chauhan) यांना दूर सारून मुख्यमंत्रिपदासाठी (Chief Minister) दुसराच चेहरा पुढे करण्याची रणनिती आखली असल्याचे सांगितले जात आहे.
त्यामुळेच भाजपने मध्यप्रदेशातील निवडणुकीसाठी अनेक उमेदवारांची नावे जाहींर केली असली तरी शिवराजसिंह चौहान (Shivrajsinh Chauhan) यांचीच उमेदवारी अजून जाहीर केलेली नाही. या पार्श्वभूमीवर आता खुद्द शिवराजसिंह चौहान यांनीच हा विषय जनतेच्या दरबारात नेला आहे. मी मुख्यमंत्री पदी राहावे असे तुम्हाला वाटते काय असा प्रश्न त्यांनी आता जाहीर सभांमध्येच विचारणे सुरू केले आहे.
त्यावर उपस्थितांकडून होकारार्थी प्रतिसाद मिळवून लोक आपल्याच मागे आहेत असे भाजप श्रेष्ठींना दाखवून त्यांच्यावर दबाव आणण्याची एक वेगळीच रणतनिती शिवराजसिंह यांनी अवलंबली असल्याचे सांगण्यात येत आहे. शुक्रवारी दिंडोरी येथे एका मेळाव्याला संबोधित करताना शिवराजसिंह चौहान यांनी लोकांना विचारले,
“मला तुम्हाला विचारायचे आहे की मी चांगले सरकार चालवत आहे की वाईट?, त्यामुळे या सरकारने पुढे जावे की नाही? तुमचा मामा पुन्हा मुख्यमंत्री (Chief Minister) बनला पाहिजे की नाही? केंद्रातील आणि राज्यातील भाजपची सत्ता टिकवायची आहे की नाही? असे प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थितांना विचारले.
गुरुवारी राज्यातील धार जिल्ह्यात एका सभेला संबोधित करताना कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी शिवराजसिंह चौहान पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत, असे सांगितले. त्या म्हणाल्या की, पंतप्रधान मोदी इथे येतात, पण आजकाल ते शिवराजजींचे नाव घेण्यास टाळाटाळ करत आहेत, फक्त स्वत:चेच नाव मोदी पुढे करतात.
त्यामुळे शिवराजसिंह चौहान यांना मुख्यमंत्री करायचे नाही असे आता भाजपनेच ठरवले आहे असे दिसते आहे अशी टिप्पणी प्रियंका गांधी यांनी केली होती. राज्याचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले चौहान अलीकडेच सार्वजनिक कार्यक्रम आणि रॅलींमध्ये भावूक होताना दिसत आहेत.
नुकत्याच झालेल्या बुधनी येथील एका सार्वजनिक कार्यक्रमात चौहान यांनी लोकांना विचारले की मी निवडणूक लढवायची की नाही? बुधनी येथील एका मेळाव्यात मुख्यमंत्र्यांनी महिलांना सांगितले होते की, “माझ्यासारखा भाऊ” जवळ नसताना तुम्ही मला मुकाल आणि मी गेल्यावरच तुम्हाला माझे महत्व कळेल.
शुक्रवारी उज्जैन येथे आयोजित एका कार्यक्रमात, ते म्हणाले की राजकारणाचा मार्ग निसरडा आहे आणि प्रत्येक पायरीवर घसरण्याची भीती आहे, तत्पुर्वी खरगोनमध्ये चौहान म्हणाले होते की मला कोणत्याही पदाचा लोभ नाही, माझ्या शरीरातील हाडे आणि मासांचा उपयोग करून लोकांचे भले होणार असेल तर मला आनंदच आहे.
त्यांच्या अशा प्रकारच्या निर्वाणीच्या वक्तव्यातून ते भाजप श्रेष्ठींनाहीं येथे आपल्याशिवाय दुसरा पर्याय असू शकत नाही असे इशारे देत आहेत असे मानले जात आहे. 230 सदस्यांच्या मध्य प्रदेश विधानसभेच्या निवडणुका वर्षाच्या अखेरीस होण्याची शक्यता आहे. भाजपने 79 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत,
ज्यात केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर, प्रल्हाद पटेल आणि फग्गन सिंग कुलस्ते तसेच पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि इंदूरचे बलाढ्य नेते कैलाश विजयवर्गीय यांचा समावेश आहे, हे सर्व राजकीय दिग्गज मुख्यमंत्रिपदाचे दावेदार म्हणून पाहिले जात आहेत. मध्यप्रदेशात आपल्याकडे महत्वाची जबाबदारी येईल.
असे वक्तव्य विजयवर्गीय यांनी करून चौहान यांच्याबद्दल वेगळाच संदेश दिला असल्याचेही मानले जात आहे. या पार्श्वभूमीवर आता शिवराजसिंह चौहान यांनीच आता आक्रमक भुमिका घेत आपल्या मुख्यमंत्रीपदासाठी जनतेतूनच दबाव आणण्याचा मार्ग स्वीकारला आहे असे सांगण्यात येत आहे.