सातारा – महाविकास आघाडी सरकारची महत्त्वाकांक्षी शिवभोजन थाळी योजना सातारा जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात येणार आहे. प्रारंभी प्रायोगिक तत्त्वावर सातारा शहरात चार ठिकाणी प्रजासत्ताक दिनापासून (26 जानेवारी) योजनेचा शुभारंभ करण्यात येणार असून सुरुवातीला 500 थाळ्या देण्यात येणार आहेत, अशी माहिती पुरवठा विभागाच्या सूत्रांनी दिली.
शिवसेना-भाजप युतीचे सरकार 1995 मध्ये सत्तेवर आल्यानंतर राज्यात झुणका-भाकर केंद्रे सुरू करण्यात आली होती. महाआघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवडणूक जाहीरनाम्यात दिलेल्या वचनांची पूर्ती करण्यासाठी झुणका-भाकर केंद्रांच्या धर्तीवर शिवभोजन योजनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रजासत्ताक दिनी या योजनेचा शुभारंभ होणार आहे.
या योजनेत सातारा जिल्ह्यात 500 थाळ्या मंजूर करण्यात आल्या आहेत. अल्प दरात भोजन उपलब्ध करून देण्याची ही योजना पहिल्या टप्प्यात प्रायोगिक तत्त्वावर तीन महिन्यांसाठी राबविण्या येणार आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयात सुरुवातीला किमान एक भोजनालय सुरू करण्यात येईल. त्यानंतर प्रतिसाद पाहून इतर भागात ही योजना राबवण्यात येणार आहे.
या योजनेंतर्गत सुरू करण्यात येणाऱ्या भोजनालयात दोन चपात्या, एक वाटी भाजी, एक मूद भात, एक वाटी वरण यांचा समावेश असलेली जेवणाची थाळी दहा रुपयांना देण्यात येणार आहे. भोजनालय चालवण्यासाठी सद्य स्थितीत सुरू असलेल्या खानावळी, एनजीओ, महिला बचत गट भोजनालय, रेस्टॉरंट अथवा सक्षम असलेले भोजनालय त्या त्या स्तरावर समितीने निवडायचे आहे. ज्या ठिकाणी गरीब किंवा मजुरांची अधिक वर्दळ आहे, त्या ठिकाणी ही केंद्रे प्रस्तावित करण्यात आली आहेत.
यामध्ये जिल्हा परिषद, एसटी आगार, बाजार समितीतील उपहारगृह, मोती चौकातील बेंद्रे स्नॅक्स कॉर्नर या ठिकाणी या योजनेचा शुभारंभ करण्याचे प्रस्तावित आहे. शहरी भागासाठी 40 तर ग्रामीण भागासाठी 34 रुपये अनुदान शासनाकडून दिले जाणार आहे. हा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्याची आखणी अंतिम टप्यात आहे, असे पुरवठा विभागातील सूत्रांनी सांगितले.