बेल्ह्यातील नागरिकांची घरांभोवती वाड्या-वस्त्या, शेतावर उपाययोजना
बेल्हे – बेल्हे (ता. जुन्नर) आणि परिसरात बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्याचे प्रमाण लक्षात घेता जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील नागरिक आपलं संरक्षण करण्यासाठी वाड्या-वस्त्यांवर आणि शेतात रहाणारे शेतकरी आपल्या घराभोवती जाळ्या बसवित आहेत.
वनविभागाच्या वतीने परिसरातील ग्रामस्थांमध्ये आणि विद्यार्थांमध्ये वनविभागाकडून जनजागृती केली जात आहे. ज्या शेतकरी वर्गाच्या घरापुढे शेतजमीन आहे, असे शेतकरी त्यांची पाळीव जनावरे, तसेच इतर छोटी जनावरे घराच्या संरक्षण बसविलेल्या जाळीच्या आत जनावरे बांधित आहेत, त्यामुळे जनावरे, तसेच माणसांवर बिबट्यांचे भविष्यात हल्ले कमी होण्याची शक्यता असल्याची नागरिकांना आशा आहे.
वनविभागाकडूनही नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. शेतात रात्रीच्या वेळी शेतकऱ्यांनी एकटे-दुकटे न जाता दोघा-तिघांनी गटागटाने जावे, रात्रीच्या वेळी समोर काय आहे, हे दिसण्यासाठी विजेऱ्या घेऊन जावे, तसेच दोन तीन माणसे आहोत हे दिसण्यासाठी आपल्याजवळील मोबाईलचा मोठा आवाज करून बोलत जाणे, शाळकरी मुलांना शाळेतून येताना किंवा रात्री एकटे सोडू नये, पालकांनी घेऊन यावे.
रात्रीच्या वेळी बिबट्याच्या हल्ल्यापासून संरक्षण व्हावे यासाठी हातात काठी घेउन जावे, तसेच यावेळी दुचाकींचा प्रवास टाळावा, अशा सूचना देऊन नागरिकांमध्ये जनजागृती वनविभाग करत असल्याची माहिती बेल्हे वनपाल दत्ता फापाळे यांनी दिली आहे. बिबट्या दिसला तरी लगेचच लोक वनखात्याला कळवण्याचे आवाहन वनविभागाने नागरिकांना केले आहे.