सातारा – “छत्रपती शिवाजी महाराज की जय’, “जय शिवाजी, जय भवानी’च्या जयघोषात किल्ले प्रतापगडावर शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जिल्हा परिषद प्रशासनाने केलेल्या नेटक्या नियोजनामुळे सर्व विधी मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साही वातावरण पार पडले. जिल्हा परिषदेच्या वतीने शिवजयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
जिल्हा परिषदेच्यावतीने प्रतापगडावर शिवजयंतीनिमित्त दरवर्षी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. गेली दोन वर्षे करोनामुळे शिवजयंती उत्सव करोना नियमांचे पालन करून अगदी मोजक्या लोकांमध्ये साजरा करण्यात आला. यावर्षी करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शिवभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. शिवज्योत नेण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवभक्त किल्ले प्रतापगडावर शुक्रवारी रात्रीपासूनच दाखल झाले होते. शनिवारीही मोठी गर्दी गडावर होती. या उत्सवास महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी उपस्थिती लावल्याने उत्सवाच्या उत्साहात आणखी भर पडली. शिवजयंतीदिनी प्रतापगडावरील भवानी मातेस अभिषेक आणि पूजा करण्याचा मान जिल्हा परिषद अध्यक्षांना असतो.
मात्र, यावर्षी शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले यांना अभिषेक करण्याचा मान अध्यक्ष उदय कबुले यांनी दिला. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते भवानीमातेची पूजा करण्यात आली. यावेळी अध्यक्ष उदय कबुले, कृषी सभापती मंगेश धुमाळ, महिला व बालकल्याण सभापती सौ. सोनाली पोळ, समाजकल्याण सभापती सौ. कल्पना खाडे, प्रकल्प संचालक सुषमा देसाई, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, अर्चना वाघमळे, रोहिणी ढवळे, किरण सायमोते, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास सावंत, भीमरावकाका पाटील, अरुण गोरे, रमेश पाटील, कमल जाधव, सुरेखा जाधव, सागर शिवदास, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार, कृषी अधिकारी विजय माईनकर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय शिंदे, समाजकल्याण अधिकारी डॉ. सपना घोळवे, जिल्हा जलसंधारण अधिकारी अरुणकुमार दिलपाक, शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे, उपशिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे, महाबळेश्वरचे सभापती संजूबाबा गायकवाड, सातारच्या सभापती सौ. सरिता इंदलकर, कराडचे सभापती प्रणव ताटे, महाबळेश्वरचे गटविकास अधिकारी ए. बी. मरभळ,
फलटणच गटविकास अधिकारी डॉ. अमिता गावड, यांच्यासह जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, सदस्य, पंचायत समित्यांचे सभापती, सदस्य, विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. सकाळी 9 वाजता श्री भवानी माता मंदिरासमोर यशोमती ठाकूर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यांनतर पालखी मिरवणुकीचा सोहळा झाला. पालखी मिरवणुकीनंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे पूजन व ध्वजारोहणाचा कार्यक्रम यशोमती ठाकूर व उदय कबुले यांच्या हस्ते झाला.