-अमित डोंगरे
भारतीय क्रिकेट संघासाठी सेकंड बेंच सातत्याने तयार होत आहे. यात बीसीसीआयबरोबर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचेही योगदान मोलाचे आहे. यातूनच सध्या अमिरातीत सुरू असलेल्या आयपीएल स्पर्धेतून शिवम मावी व कमलेश नागरकोटी यांच्याकडे भविष्यातील इंडिया मटेरियल म्हणून पाहिले जात आहे.
जेव्हा महान गोलंदाज कपिल देव निवृत्त झाले तेव्हा आता भारतीय संघाच्या वेगवान गोलंदाजीचा भार कोण वाहणार, असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळी जवागल श्रीनाथ हा त्यांचा काही प्रमाणात का होइना वारसदार ठरला. मात्र, त्यावेळी संघात निवड झालेला वेंकटेश प्रसाद आणि अन्य काही गोलंदाज संघात कसे निवडले गेले अशी टीका होत होती. त्यावेळी पाकिस्तानचा माजी कर्णधार व सुलतान ऑफ स्विंग म्हणून ओळखला जात असलेला वसीम अक्रम याने खूप महत्त्वाचे वक्तव्य केले होते.
बीसीसीआयची निवड समिती दक्षिण भारतातून वेगवान गोलंदाज कसे निवडते. क्रिकेट ज्यांना समजते ते अक्रमच्या वक्तव्यावर आक्षेप घेणार नाहीत. उत्तरेतून आलेलेले पाकिस्तानी गोलंदाज पाहिले तर हे लक्षात येते की, आशियाइ देशांत उत्तरेतून आलेले गोलंदाज सर्वात भेदक अस्त्र ठरले आहेत. खुद्द अक्रम, वकार युनुस, शोएब अख्तर हे पाकिस्तान संघात उत्तरेतूनच आले. आपल्याकडे आता उत्तरेतून आलेला महंमद शमी आहे आणि आता त्याच्या पावलावर पाऊल ठेवत उत्तरेतून नसले तरी राजस्थान व उत्तर प्रदेशातून अनेक युवा गोलंदाज येत आहेत. प्रत्येकाकडे गुणवत्ता आहे का नाही ते येणारा काळच ठरवेल. मात्र, सध्याच्या आयपीएल मधील विविध गोलंदाज पाहिले तर असे लक्षात येते की शिवम मावी व कमलेश नागरकोटी यांच्याकडे आता इंडिया मटेरियल म्हणून पाहिले जात आहे.
2018 साली झालेल्या 19 वर्षांखालील विश्वकरंडक स्पर्धेचे मावी हे फाइंड आहे. वेगवान गोलंदाज असला तरीही त्याच्याकडे फलंदाजीचीही क्षमता आहे व त्याने विश्वकरंडकातही ते सिद्ध केले. मैदानावरचा त्याचा वावरच जाणकारांच्या आश्चर्याचा विषय बनला आहे. एखाद्या नवख्या खेळाडूप्रमाणे दबून राहणे त्याच्यात कधीची दिसले नाही. व्हेन आय क्रॉस द बाउंड्री रोप आय फिल इन टोटल कंट्रोल, असे सर डॉन ब्रॅडमन म्हणायचे त्याचे मूर्तीमंत उदाहरण मावीकडे पाहिल्यावर लक्षात येते.
ला दोन वर्षांपूर्वीच कोलकाता नाइट रायडर्सने तब्बल 3 कोटी रुपयांना आपल्या संघात घेतले यातच त्याची गुणवत्ता अफाट आहे हे वेगळे सांगायला नको. यंदाच्या स्पर्धेतही त्याने आपली कामगिरी राजस्थानविरुद्धच्या सामन्यातून सिद्ध केली. आता या स्पर्धेत तो सातत्यपूर्ण कामगिरी करण्यात यशस्वी ठरला तर आगामी टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड करताना त्याच्या नावाची विचार केला जाण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.
कमलेश नागरकोटी बाबत बोलायचे झाले तर त्याच्यात झहीर खानचीच गुणवत्ता झळकते. राजस्थानमध्ये जन्मलेल्या कमलेशने 2016-17 सालच्या विजय हजारे करंडक स्पर्धेतून प्रथम दर्जाच्या क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही. शिवम मावी प्रमाणेच हा युवा गोलंदाजही वयाच्या विशीत आहे. त्यामुळे खूप मोठी कारकीर्द त्याला खुणावत आहे.
गुजरातविरुद्धच्या याच स्पर्धेतील सामन्यात त्याने हॅट्ट्रिक घेत देशांतर्गत क्रिकेटच्या वर्तुळात एन्ट्री केली. त्याच्याकडे वेग आहे, बाउंन्स आहे तसेच भन्नाट यॉर्कर आहे. भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहप्रमाणे कमलेशही यॉर्कर टाकण्यात माहिर आहे. एखाद्या परदेशी गोलंदाजाप्रमाणे सातत्याने ताशी 149 किलो मिटर इतक्या प्रचंड वेगाने गोलंदाजी करण्याची त्याची क्षमता अनेकांच्या भुवया उंचावत आहे.
कोलकाता नाइट रायडर्सच्या ताफ्यात मावीसह कमलेशही असल्याने त्यांच्या कामगिरीवर आता निवड समितीची नजर आहे. आयपीएल स्पर्धा संपल्यानंतर आगामी मालिकांसाठी या दोन्ही खेळाडूंना संधी देण्याचा विचार झाला तर कदाचीत देशाला झहीर खान व बुमराह यांचे वारसदार निश्चितच मिळालेले असतील.