मुंबई – शिवसेनेत फूट पडल्याने राज्यात राजकीय संकट ओढावलेले आहे. सत्तेचा हा पेचप्रसंग थेट सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे. हे प्रकरण पाच किंवा अधिक न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे पाठवणे, खरी शिवसेना कोणाची, तसेच बंडखोर आमदारांच्या अपात्रतेबाबत अशा मुद्दांवर सुनावणी होणार आहे. या सुनावणीदरम्यान निकाल कोणाच्या बाजूने लागणार याकडे महाराष्ट्रासह देशभराचे लक्ष लागले आहे.
शिवसेना नक्की कुणाची उद्धव ठाकरे यांची की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची याबाबतचा फैसला उद्याच्या सुनावणीत होणार आहे. या प्रकरणी 8 ऑगस्टला सुनावणी होणार होती. मात्र, ही तारीख बदलून 12 ऑगस्ट करण्यात आली. त्यानंतर ही तारीख पुन्हा बदलून 22 ऑगस्ट केली आहे. या प्रकरणावर सखोल कायदेशीर युक्तिवाद होण्याची गरज असेल तर हे प्रकरण व्यापक घटनापीठाकडे देण्याचा विचार केला जाऊ शकतो, असे मत गेल्या सुनावणीमध्ये सरन्यायाधीशांनी मांडले होते. त्यामुळे या प्रकरणी घटनापीठ स्थापन करण्यासंदर्भात न्यायालय काय निर्णय देते, याकडे दोन्ही गटांसह राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.
दुसरीकडे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा हे 26 ऑगस्ट रोजी निवृत्त होत असून त्यांच्या जागी महाराष्ट्राचेच न्या. उदय लळित हे सरन्यायाधीश होणार आहेत. त्यामुळे सरन्यायाधीश रमणा यांच्या निवृत्तीपूर्वी महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निकाल लागणार की नाही, हे अद्याप स्पष्ट नाही. त्यामुळे आता उद्या म्हणजेच 22 ऑगस्ट रोजी होणाऱ्या सुनावणीत काय होते, याकडे लक्ष लागले आहे.
दरम्यान, शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेत मोठी फूट पडली आहे. बंडाळीनंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत 40 आमदारांनी बंडखोरी करत शिंदे गटात समावेश केला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी राज्यात भाजपासोबत युती करत सरकार स्थापन केले आहे.