वाल्हे (समीर भुजबळ) – सर्वसामान्य ग्राहकांस म्हशीच्या दुधास 68 रुपये प्रती लिटर दराने दूध तर शेतकऱ्यांच्या हातावर लिटरमागे 45 रुपये ठेवणारी व मधला 22 रुपये प्रति लिटर नफा कमवणारी तसेच गायीच्या दुधास सर्वसामान्य ग्राहकांस 50 ते 52 रूपये तर दूध उत्पादकच्या हातावर प्रतिलिटर 33 रूपये मिळतात. गायीच्या प्रतिलिटर दुधामागे 17 ते 19 रूपये नफा कमवणारी व्यवस्था म्हणजेच गोचीडच. या व्यवस्थेला शोषण करणारे गोचीडच म्हणावे लागेल.
उन्हाळा सुरू होताच दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दूध दरामध्ये प्रतिलिटर 2 ते 3 रूपये दरवाढ करण्यात आली होती. शेतकरी वर्गाच्या दूध दरात दरवाढ करताच जनावरांच्या पशुखाद्यतही मोठी दरवाढ करण्यात आली होती. उन्हाळा संपताच शेतकरीवर्गाच्या दूध खरेदीत पुन्हा 3 रुपयांनी कपात करण्यात आली तर पशुखाद्यातील दरवाढ मात्र नियमित करण्यात आली होती. मागील काही दिवसांपासून सर्वसामान्य ग्राहकांना दुधाच्या खरेदीत 2 रूपये दरवाढ करण्यात आली. तरीही दूध उत्पादक शेतकरीवर्गाकडून खरेदी केले जात असलेल्या दुधाच्या दरात कोणतीही दरवाढ न करता पशुखाद्याच्या किंमती मात्र प्रति पोत्यामागे 50 रूपये दरवाढ केल्याने, शेतीपूरक व्यवसाय म्हणून दूध व्यवसाय करणाऱ्या शेतकरीवर्गापुढे अडचणींचा आलेख वाढतच असल्याने, “शेतकरीवर्गाने जगायचे तरी कसे’? असा प्रश्न शेतकरीवर्गाकडून होत आहे.
वाढीबाबत राजकीय नेते उदासीन
शेतकऱ्यांच्या दूध प्रश्नांवर सरकार तसेच विरोधी पक्ष गंभीर नाही. सरकार लक्ष देत नाही आणि विरोधी पक्ष फक्त फोटो पुरते आंदोलन करतो. त्यामुळे आपली घुसमट कोणाकडे मांडावी हाच प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. राजकीय नेत्यांना दूधदर कपात बाबत गांभीर्य नसण्याचे कारण म्हणजे राज्यातील सहकारी व खासगी दूध संघ राजकीय नेत्यांच्या वर्चस्वाखाली आहेत. दूध उत्पादक शेतकरी व दूध ग्राहकांची लूट हा एकमेव अजेंडा या लोकांचा आहे.
“गायी, म्हशीच्या दुधास बाजारभाव मिळणे अपेक्षित असताना दूध दरात मात्र कपात होत असल्याने, शेतकरीवर्ग मेटाकुटीस आला आहे. गायीच्या दुधाला किमान सद्यःस्थितीत वाढत्या महागाईत 50 रुपये प्रति लिटर तर म्हशीच्या दुधास 62 रूपये प्रतिलिटर दर मिळाला तरच हे शेतकरी दूध व्यवसायात तग धरू शकतो.”
– विक्रमसिंह भोसले, दूध उत्पादक शेतकरी, वाल्हे
“दूध उत्पादकांना दूध संघाकडून मिळत असलेल्या बाजारभावाप्रमाणे प्रतिलिटर दून दर देण्यात येतो; मात्र यामध्ये शेतकऱ्यांचे उत्पन्न तोट्यातच आहे. शेतकरी जनावरे टिकवायची आहेत याच उद्देशून अजून तरी दुध व्यवसाय करीत आहेत; मात्र शासनाने शेतकऱ्यांच्या खरेदीच्या दुधाला योग्य दर वाढवून द्यावा. नाहीतर दूध डेअरी यापुढे चालवणे अवघड होणार असून परिणामी दूधसंघासह भविष्यात दूध टंचाईची अडचण निर्माण होऊ शकते. यामुळे शासनाने दूध उत्पादकांना प्रतिलिटर किमान 15 रूपये दरवाढ करावी.”
– अमोल खवले, दूध डेअरी चालक, वाल्हे
“मागील सहा महिन्यात पशुखाद्याच्या एका पोत्यामागे, 170 ते 200 रूपये दरवाढ करण्यात आली. तसेच मागील सहा महिन्यात दूध दरामध्ये 3 रूपये कपात करण्यात आली; एकीकडे जनावरांच्या हिरव्या चाऱ्यांचा गंभीर प्रश्न असताना दूध दरात वाढ होणे अपेक्षित होते, मात्र दरात कपात होत असून, पशुखाद्याच्या किंमती मात्र वाढतच आहेत. यामुळेच दूध उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडत आहेत.”
– सतीश भुजबळ, दूध उत्पादक शेतकरी, वाल्हे