पुणे – पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागातील “शिवभोजन’ थाळी केंद्रांना घरघर लागली आहे. जिल्ह्यातील 166 केंद्रांपैकी केवळ 59 केंद्र सुरू आहेत. या केंद्रचालकांची देखील देयके रखडली आहेत, तर काहींकडून थाळी वितरणात अनियमितता आढळली आहे. त्यामुळे त्यांच्या सुनावण्या सुरू असल्याने आणखी केंद्र बंद होण्याच्या मार्गावर आहेत.
गरिबांना अल्पदरात जेवण देण्याच्या उद्देशाने महाविकास आघाडी सरकारने जानेवारी 2020 मध्ये शिवभोजन केंद्रांवर 10 रुपयांत थाळी वितरित करण्यास सुरुवात केली. त्यानुसार पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात 86, तर उर्वरित तालुक्यांच्या 80 ठिकाणी अशी 166 ठिकाणी शिवभोजन केंद्र सुरू करण्यात आली. या केंद्रांवर काहींनी गैरफायदा घेतला जाऊ नये म्हणून “अन्नपूर्णा’ ऍपद्वारे वितरणावर नियंत्रण ठेवले जात होते. परंतु, अनेक ठिकाणी या केंद्रचालकांकडून रोज येणाऱ्या व्यक्तींचे छायाचित्र एकच असल्याचे आढळून आले, तर काही ठिकाणी थाळीचा लाभ न देता थाळी वितरित झाल्याची माहिती समोर आली आहे.
काही केंद्रचालकांच्या ग्राहकांकडून जिल्हा प्रशासनाकडे तक्रारी देखील प्राप्त झाल्या. तर महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर सत्तेतील शिंदे-फडणवीस सरकार, पुन्हा राजकीय अस्थिरता अशा अनेक कारणांचा फटका प्रशासकीय यंत्रणेवर पडल्याने केंद्रचालकांना देण्यात येणारे मानधन देखील रखडल्याने अनेक केंद्र चालकांनी स्वत:हून केंद्र बंद केले. तर काही केंद्रचालकांचा मृत्यू झाला आहे. शिवाय, काहींचे पत्ते बदलले असल्याने शिवभोजन केंद्र रद्द करण्यात आले. त्यामुळे शहरातील 37 तर ग्रामीण भागातील अवघे 22 असे एकूण 59 शिवभोजन केंद्रच सुरू आहेत.