सुभाष कदम
शासनाला 81 हजारांचा गंडा; जमीन क्षेत्राची बोगस नोंद; पूरग्रस्त वंचित
शिराळा – शिराळा तालुक्यात अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या यादीमध्ये कुंपणच शेत खात असल्याची माहिती समोर आली आहे. पणुंब्रे वारूण (ता. शिराळा) या भागात “झीरो’ तलाठी म्हणून कार्यरत असलेल्या क्लार्कने स्वतःच्या व पत्नीच्या नावे एक गुंठाही जमीन नसताना बनावट कागदपत्रांच्या आधारे 3.31 हेक्टर क्षेत्र दाखवून पूरग्रस्तांच्या मदत निधीतील 81 हजार रुपये रकमेवर डल्ला मारल्याचे उघड झाले आहे.
गेल्या वर्षी जुलै व ऑगस्टमध्ये झालेली अतिवृष्टी व महापुरामुळे बाधित झालेल्या शिराळा तालुक्यातील शेतकरी, नागरिकांसाठी शासनाने 20 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. त्यातील 17 कोटी 9 लाख रुपये बाधित शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यांवर जमा करण्यात आले आहेत. मात्र, या वाटपातून प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
तालुक्यातील बहुतांश तलाठ्यांनी स्वतःच्या जबाबदारीवर “झीरो’ तलाठी ठेवले आहेत. त्यांच्या मनमानी कारभाराचा फटका पूरग्रस्तांना बसला आहे. ते शासकीय मदतीपासून वंचित राहिल्याने संताप व्यक्त होत आहे. अतिवृष्टी व महापुरामुळे शिराळा तालुक्यात सर्वच गावांना मोठा तडाखा बसला होता. यात 95 गावांमधील 24 हजार 846 शेतकऱ्यांचे 8654.52 हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते.
त्यापैकी तीन हजार 241 शेतकरी कर्जदार व 21 हजार 607 शेतकरी बिगरकर्जदार आहेत. या सर्व शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यांवर 17 कोटी 8 लाख 91 हजार 915 रुपये नुकसान भरपाई जमा करण्यात आली. या पणुंब्रे वारुण भागातील “झीरो’ तलाठ्याने महसूल व कृषी विभागातील अधिकाऱ्यांशी संगनमत करून स्वतःच्या नावावर एकही गुंठा जमीन नसताना बोगस सातबारा, खाते उतारे तयार करून शासनाला सादर केले.
स्वतःच्या व पत्नीच्या नावावर मिळून तीन हेक्टर 31 गुंठे क्षेत्र बाधित दाखवले होते. त्याच्या बॅंक खात्यावर नुकसानभरपाईचे 81 हजार रुपये जमा झाले आहेत. “झीरो’ तलाठी म्हणून काम करणाऱ्या संबंधित लिपिकाने यापूर्वी पंतप्रधान सन्मान योजनेत आपल्या नावावर चुकीचे क्षेत्र दाखवून लाभ घेतल्याची चर्चा आहे. बोगस कागदपत्रांच्या आधारे शासनाला गंडा घालणारा संबंधित लिपिक व त्याला सामील असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी अन्यथा पणुंब्रे वारुण व चरण भागातील नागरिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करतील, असाचा इशारा देण्यात आला आहे.