सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात दहिवडी गावापासून 20 किलोमीटर अंतरावर व पुण्यापासून 160 किलोमीटर अंतरावर शिखर शिंगणापूर क्षेत्र आहे. हा परिसर टेकड्यांनी वेढलेला आहे. कोथळा घाटातील नागमोडी वळणावरून उंच शिखरावर विराजमान झालेले शंभू महादेवाचे मंदिर दिसते. चारशे पायऱ्या चढून वर जावे लागते. हे मंदिर चालुक्यकालीन असून, त्याचा जीर्णोद्धार शिवाजी महाराजांनी केला आहे. हे मंदिर म्हणजे स्थापत्यशास्त्राचा हा एक उत्कृष्ट नमुना आहे. मंदिराभोवती दगडी तटबंदी आहे.
मोठ्या घंटा व लहानमोठ्या असंख्य दीपमाला आहेत. मंदिरावर चक्राकार नक्षीकाम केलेले आहे. सभामंडपात हेमाडपंती पद्धतीचे नक्षीदार स्तंभ आहेत. यात तांब्यापितळेने मढवलेल्या पाच भव्य नंदींचा दरबार थाटात भरलेला दिसतो. तेथे उभे राहून देवाला नवस करायची प्रथा आहे. गाभाऱ्यात शंकर आणि पार्वतीची दोन स्वयंभू लिंग असून, त्यांना तांब्याची टोपणे आहेत.
लिंगासमवेत त्यांचीही पूजा करतात. मंदिराच्या उजव्या बाजूला अमृतेश्वराचे उर्फ बळीचे पुरातन देऊळ दिसते. तिथून खोल दरीत उतरलेले पर्वतकडे असून, एका उतरणीला मुंगी घाट म्हणतात. या घाटातच स्वयंभू शिवलिंग आहे. या गुप्तलिंगाचे दर्शन घेतल्याशिवाय यात्रा पूर्ण होत नाही. गुढीपाडव्यापासून चैत्र पौर्णिमेपर्यंत मोठी यात्रा भरते. मुंगीघाटाची भयानकता, मंदिराची कलात्मकता व शिव तीर्थाची भव्यता प्रेक्षणीय आहे.
– माधुरी शिवाजी विधाटे