शिक्रापूर- शिक्रापूर (ता. शिरूर) येथील पोलीस स्टेशन हद्दीमधील कोरेगाव भीमा येथील एक जानेवारी रोजी होणारा विजय रणस्तंभ मानवंदना कार्यक्रम शांततेत पार पाडण्यासाठी शिक्रापूर पोलिसांनी अहोरात्र कष्ट केले होते. पोलीस स्टेशनचे आठ पोलीस अधिकारी व वीस पोलीस कर्मचारी हे तब्बल चार दिवस म्हणजे नव्वदहून अधिक तास झोपलेच नाही. अखेर शिक्रापूर पोलिसांच्या कष्टाचे चीज झाले आहे. बंदोबस्त आणि कार्यक्रम देखील सुरळीत पार पडला असून शिक्रापूर पोलिसांच्या कार्याचे आता कौतुक होत आहे.
शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कोरेगाव भीमा येथे 1 जानेवारी 2018 रोजी हिंसाचार झाला होता. त्यांनतर मागील वर्षापासून मानवंदना कार्यक्रमासाठी शिक्रापूर पोलिसांना मोठ्या अडचणींना सामोरे जात कार्यक्रम शांततेत पार पाडण्यासाठी प्रयत्न करावे लागले. कार्यक्रम शांततेत पार पडावा यासाठी स्वतः कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके, पोलीस अधीक्षक संदीप पाटील हे शिक्रापूर परिसरात तळ ठोकून होते. राज्यभरातून पाच हजारांहून अधिक पोलीस अधिकारी, कर्मचारी, राज्य राखीव दलाचे जवान, होमगार्ड याचा बंदोबस्त तैनात केला होता.
हा कार्यक्रम शांततेत पार पाडण्यासाठी शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार, सहायक पोलीस निरीक्षक मयूर वैरागकर, नवनाथ रानगट, पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी, मागील वर्षीच्या बंदोबस्तात मुख्य भूमिका बजाविणारे व सध्या पदोन्नतीमुळे बाहेर जिल्ह्यात कार्यरत असलेले सहायक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे, सोमनाथ दिवटे, मनोज निलंगेकर, शिवशांत खोसे यांच्यासह तब्बल 20 पोलीस कर्मचारी हे तब्बल चार दिवस म्हणजे नव्वदहून अधिक तास झोपलेच नाहीत.
यावेळी बंदोबस्तासाठी येणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची चार दिवसांची निवासाची, जेवणाची व्यवस्था करण्यासाठी पोलिसांना विशेष परिश्रम करावे लागले आहे, यामध्ये पोलीस बंदोबस्त विभागून देण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षक शिवशांत खोसे, पोलीस नाईक विलास आंबेकर, दत्तात्रय शिंदे, संदीप जगदाळे, अनंता बाठे, अविनाश पठारे, किशोर शिवणकर यांनी परिश्रम घेतले.
निवासाच्या व्यवस्थेसाठी पोलीस निरीक्षक मनोज निलंगेकर, पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी, पोलीस नाईक योगेश नागरगोजे, हेमंत इनामे यांनी तसेच पोलिसांच्या मुख्य म्हणजे जेवणाच्या व्यवस्थेसाठी सहायक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे, पोलीस नाईक अनिल जगताप, ब्रम्हा पोवार यांनी भूमिका बजावली.
दरम्यानच्या काळामध्ये शिक्रापूर पोलिसांनी परिसरातील घडामोडींवर लक्ष केंद्रित केले होते. शिक्रापूर, कोरेगाव भीमा, तळेगाव ढमढेरे, वाजेवाडी, कोंढापुरी, वढु बुद्रुक, सणसवाडी आदी गावांमध्ये नागरिकांच्या बैठका घेत शांतता आणि सामाजिक सलोखा राखण्याचे आवाहन केले होते. या काळामध्ये 28 डिसेंबरपासून एक जानेवारीपर्यंत शिक्रापूर पोलीस स्टेशनमधून बंदोबस्त आणि बंदोबस्तातील पोलीस अधिकारी व कर्मचारी कार्यरत होते.
पोलिसांवर शुभेच्छांचा वर्षाव
गुरूवारी (दि.2) जानेवारी रोजी बंदोबस्त शांततेत आणि सुरळीत पार पडल्यामुळे अनेक स्तरांतून आणि वरिष्ठांकडून शिक्रापूर पोलीस स्टेशनचे अधिकारी, कर्मचारी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यामुळे पोलिसांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. शुभेच्छा वर्षावामुळे मात्र पोलिसांची पुन्हा झोपच उडून गेली आहे. सोहळा शांततेत पार पडला यासाठी पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसह नागरिक, ग्रामस्थ व पत्रकारांनी केलेल्या कामाचे चीज झाल्याचे शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी सांगितले.