चिंबळी (वार्ताहर) – खेडच्या दक्षिण भागात गेल्यावर्षी परतीच्या मुसळधार पावसामुळे कांदा रोपे सडून गेल्याने कांदा लागवडीचे क्षेत्र घटले. त्यामुळे यंदा कांदा पात चारा मुबलक प्रमाणात मिळत नसल्याने मेंढपाळांची पळापळ होत आहे.
चिंबळी, निघोजे, केळगाव, कुरुळी, मरकळ आदी परिसरात दरवर्षी जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात मेंढपाळ दाखल होतात. तर मार्च महिन्यात कांदा काढणी सुरू झाली की मेंढपाळांना कांदा पात चारा म्हणून मिळत असते. मात्र, गेल्यावर्षी परतीच्या पावसामुळे मोठे नुकसान झाल्याने मेंढ्यांना खाण्यालायक कांदा पात मिळत नसल्यामुळे चारा शोधण्यासाठी मेंढपाळांना कसरत करावी लागत आहे.
तर सध्या उन्हाळी हंगामातील भुईमूग, बाजरी पिकाची काढणी सुरू असून मेंढ्यांना चारा म्हणून तेच दिले जात आहे. तर इंद्रायणी नदीत जलपर्णीचा विळखा पडल्याने मेंढ्यांना हे पाणी पिता येत नसल्याने पाण्यासाठीही भटकंती करावी लागत असल्याचे मेंढपाळांचे म्हणणे आहे.