सातारा -“”मानसिक आजारांची नावे जरी वेगवेगळी असली तरी रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांचे अनेक अनुभव एकसारखेच असतात. मानसिक आजार नाकारून आपला केवळ तोटाच होतो. मानसिक आजार कोणालाही होऊ शकतो. आपल्याला किंवा आपल्या आजूबाजूला कोणाला हा त्रास असेल तर तो आपण मोकळेपणाने स्वीकारुया. मनाची भाषा समजून प्रेमानेच प्रश्न सोडवावे लागतील, अस मत प्रसिद्ध अभिनेत्री अमृता सुभाष यांनी व्यक्त केले.
येथील परिवर्तन संस्थेमार्फत आयोजित जागतिक स्किझोफ्रेनिया दिवसाच्या (दि. 24) कार्यक्रमात अमृता सुभाष बोलत होत्या. त्यांनी “आस्तु’ स्मृतिभ्रंश या मानसिक आजाराच्याविषयी चित्रपटात भूमिका करण्याचा अनुभव सांगितला. या कार्यक्रमात लेखक, चित्रपट दिग्दर्शक संदेश कुलकर्णी आणि नाट्यदिग्दर्शक अतुल पेठे, परिवर्तन संस्थेचे मानसोपचार तज्ज्ञ डॉ. सुदिपतो चॅटर्जी आणि डॉ. हमीद दाभोलकर, बजाज कंपनीचे सी. डी. दीक्षित आणि संवादक राजू इनामदार सहभागी उपस्थित होते. परिवर्तन संस्थेच्या पुणे आणि सातारा येथील मानसरंग गटातर्फे दरवर्षी हा जागतिक स्किझोफ्रेनिया दिवस अनोख्या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे साजरा केला जातो. यावर्षी करोनाच्या साथीमुळे हा कार्यक्रम ऑनलाईन पार पडला.
मनाने आजारी असलेल्या लोकांनी स्वतः रचलेल्या कविता, एकपात्री नाटक, गाणी, नृत्य याचे अतिशय सफाईतदारपणे सादरीकरण केले. नवीन असलेले ऑनलाईन तंत्रज्ञान शिकून त्यांनी अतिशय दर्जेदार कलाकृती आत्मविश्वासाने सादर केल्या. सध्या मनाने आजारी नसलेले लोकही या करोना साथीमुळे अनेक ताण आणि चिंता याचा सामना करत आहेत. अशा काळात या मनाने आजारी असलेल्या लोकांनी प्रचंड मेहनत करून, अवगत नसलेले नवे ऑनलाईन तंत्रज्ञान शिकून अतिशय यशस्वी रितीने त्यांचे सादरीकरण केले.
आपण सगळेच दोन महिन्यांपासून लॉकडाऊनमधून जात आहोत. माणसाच्या जीवनाला व्यक्त होण्यातून अर्थ प्राप्त होतो, त्यामुळे व्यक्त होणं महत्वाचं आहे, असे मत संदेश कुलकर्णी यांनी व्यक्त केले. आताच्या वेगवान आणि कोलाहलाच्या जगात आपला एकांत शोधणे एक आव्हान आहे. परंतु, बुद्धाने सांगितल्याप्रमाणे आपणच आपला प्रकाश होऊन ताकदीने चालत राहणे गरजेचे आणि महत्वाचे आहे, असे मत अतुल पेठे यांनी व्यक्त केले. सध्याच्या समाजाची मानसिक आजाराची परिस्थिती आणि परिवर्तन संस्थेची भूमिका याविषयी डॉ.सुदीपतो चॅटर्जी आणि डॉ. हमीद दाभोलकर यांनी मांडणी केली. आर्थिक सहाय्य करणाऱ्या बजाज कंपनीची भूमिका सी. डी. दीक्षित यांनी मांडली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजू इनामदार यांनी केले. सूत्रसंचालन रेश्मा कचरे यांनी केले. मोरेश्वर देशमुख यांनी आभार मानले.