जळोची -राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यात पोलिसांचे मोठे योगदान आहे. यासाठी ते शारीरिकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे. तथापि मागील सरकारने मात्र या चाचणीपेक्षा लेखी परीक्षेचे महत्त्व वाढवून भरतीप्रक्रियेत अचानकपणे अन्यायकारक बदल केला, असे सांगत खासदार सुप्रिया सुळे यांनी पोलीस भरतीमधील शारीरिक चाचणी पुन्हा 100 गुणांची करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री उ्द्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
मागील सरकारने मागील सरकारने दि. 18 जानेवारी 2019 रोजी अचानक एक अध्यादेश काढत शारीरिक चाचणीचे महत्व कमी केले आणि लेखी परीक्षेवर भर दिला गेला. या निर्णयामुळे राज्यभरातील पोलीस भरतीसाठी इच्छुक असलेले सर्वसामान्य तरुण आणि विशेषतः ग्रामीण भागातील उमेदवारांवर प्रतिकूल परिणाम झाला आहे.
तत्कालीन सरकारचा तो अद्यादेश मागे घेऊन शारीरिक चाचणीही लेखीप्रमाणे 100 गुणांची व्हावी. याशिवाय लेखी परीक्षा महापोर्टलच्या माध्यमातून न होता मैदानी चाचणीनंतर लगेचच ऑफलाईन पद्धतीने घ्यावी. तसेच भरतीचे वेळापत्रकही वर्षभर अगोदर जाहीर करावे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे भरतीची पदसंख्या वाढवून मेगाभरती घेण्यात यावी, असे सुळे यांनी निवेदनात म्हटले आहे.