Sharmistha Mukherjee : माजी दिवंगत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी काँग्रेसच्या नेतृत्वाविषयी मोठे विधान केले आहे. यावेळी त्यांनी सरळ गांधी-नेहरू घराण्याचा उल्लेख करत पक्ष नेतृत्व अन्य कोणाकडे देण्याचा विचार करण्याची वेळ आली असल्याचे म्हटले आहे. त्या जयपूरमध्ये आयोजित एका सांस्कृतिक महोत्सवा दरम्यान बोलत होत्या. लोकसभेत काँग्रेसच्या जागा कमी झाल्या आहेत. तरीही राष्ट्रीय राजकारणात काँग्रेस हा महत्त्वाचा पक्ष असल्याचे त्यांनी नाकारले नाही.
सांस्कृतिक कार्यक्रमा दरम्यान, शर्मिष्ठा मुखर्जी यांनी काँग्रेसच्या आजपर्यंतच्या कामगिरीचा आलेख सादर करत सध्या पक्षात असणाऱ्या चढ-उरतावर आपले परखड मत मांडले. यावेळी बोलताना,”काँग्रेस देशातला प्रमुख विरोधी पक्ष आहे. या पक्षाचे देशातले स्थान आजही निर्विवाद आहे. मात्र पक्षाला उभारी आणायची असेल, बळ द्यायचं असेल तर पक्षाच्या नेत्यांनी आणखी काम करण्याची गरज आहे. काँग्रेस पक्षाने सदस्य मोहीम चालवली पाहिजे. तसंच पक्षातंर्गत निवडणुका घेऊन लोकशाही पद्धत अवलंबली पाहिजे. मोठे किंवा छोटे निर्णय यासंबंधी पक्षातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला विश्वासात घेऊन त्यानंतर निर्णय घेतले पाहिजेत. माझे वडील प्रणव मुखर्जी यांनीही त्यांच्या डायरीत लिहिलं आहे की लोकांमध्ये जाऊनच काँग्रेसला मोठं व्हावं लागेल. जादूची छडी फिरवली आणि बळ मिळालं असं होणार नाही. असेही शर्मिष्ठा यांनी स्पष्टपणे सांगितले.
#WATCH | Author and daughter of former President Pranab Mukherjee, Sharmistha Mukherjee says, ” Congress needs to take care of this thing that, in 2014 & 2019, Rahul Gandhi lost in a very bad manner, he was the face of Congress. Two Lok Sabha elections happened…if a party is… pic.twitter.com/vbW9zXOpEz
— ANI (@ANI) February 5, 2024
पुढे त्यांनी, काँग्रेसने एका गोष्टीची काळजी घेतली पाहिजे की राहुल गांधी यांच्या नेतृत्वात २०१४ आणि २०१९ या दोन्ही लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचा पराभव झाला आहे. दोन लोकसभा निवडणुकांमध्ये पराभव झाल्यानंतर कुठल्याही पक्षात नेतृत्व बदल झालाच असता. भाजपात असं काही झालं असतं तर तिथेही नेतृत्व बदल झालाच असता. एकच नेता आपल्या पक्षाला हरवत आहे त्यामुळे पक्षाच्या नेत्यांनी चेहरा कोण असेल याचा विचार केला पाहिजे असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे पक्ष नेतृत्वात बदल झाला पाहिजे असे मत मांडले.
काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविषयी बोलताना शर्मिष्ठा मुखर्जी यांनी, “राहुल गांधींबाबत मी काही भाष्य करणार नाही. कुठल्याही एका व्यक्तीबाबत असं भाष्य वगैरे करता येत नाही. माझ्या वडिलांबाबतही मला ते सांगता येणार नाही. काँग्रेसच्या नेत्यांनीच या प्रश्नाचं उत्तर शोधलं पाहिजे.” असे म्हणत राहुल गांधींवर बोलणं टाळलं.
शर्मिष्ठा मुखर्जी पुढे म्हणाल्या, “मी काँग्रेसची समर्थक आणि जबाबदार नागरिक आहे. मी पक्षाबाबत चिंता वाटते आहे ती व्यक्त करते आहे. आता ही वेळ आली आहे की काँग्रेस पक्षाने नेहरु आणि गांधी घराण्यांच्या सीमेबाहेर जाऊन विचार केला पाहिजे. माझ्यावर कदाचित लोक विश्वास ठेवणार नाहीत पण मी काँग्रेसचीच कार्यकर्ता आहे. काँग्रेसने अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज आहे. काँग्रेसला हा विचार करावा लागेल की नेमकी आपली विचारधारा घेऊन आपण पुढे जात आहोत का? तसंच अभिव्यक्ती स्वातंत्र्य, सहिष्णुता, धर्मनिरपेक्षता या मुद्द्यांचं पालन पक्षात खरंच होतं आहे का?” असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.