प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 21 -महाराष्ट्र काही मागासलेले राज्य नाही. कोणत्याही बाजूने राज्याची सीमा सोडून गेलो तर गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश या सगळ्या ठिकाणी आपल्याला गुळगुळीत रस्ते दिसतात. आपल्याकडेच राजकारणी चांगले रस्ते का करत नाहीत, असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी रविवारी केला. माझ्या नवऱ्याच्या हातात सत्ता येईल तेव्हाच महाराष्ट्रातील रस्ते चांगले होतील, असा दावा त्यांनी केला.
एका कार्यक्रमानिमित्त त्या पुण्यात आल्या होत्या. त्यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांकडे लक्ष द्यावे, असे मी एकदा मध्यरात्री केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना दूरध्वनी करून सांगितले होते. त्यानंतर घरी आलेल्या गडकरी यांनी माझ्या भाषणात तुमचा उल्लेख केला’ असे सांगितले.
महाराष्ट्र केंद्राला सर्वाधिक कर देतो. त्याबदल्यात आधी राज्यातील रस्ते सुधारायला हवेत, अशी अपेक्षा ठाकरे यांनी व्यक्त केली.
अमित, आदित्य ठाकरेंना शुभेच्छा
अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहेत. राज्यातील सर्वाधिक मतदार युवक असून, या दोन्ही युवा नेत्यांना युवकांचे प्रश्न माहिती आहेत. या दोघांनाही माझ्या शुभेच्छा आहेत, असे ठाकरे म्हणाल्या. घरात बसून केवळ गृहिणीपद सांभाळण्यापेक्षा महिलांनी उद्योग व्यवसायात यशाचे शिखर गाठावे, असे मत त्यांनी व्यक्त केले.