डॉ. राजू गुरव पुणे, दि. 21 -महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या (विद्या प्राधिकरण) संचालक पदावर “आयएसआय’ दर्जाचा अधिकारी राज्य सरकारने बसवला खरा; पण त्यांच्या कार्यालयात बुरशी, दुर्गंधी आणि डासांनी थैमान घातलंय. परिणामी या संचालकांना दुसऱ्या अधिकाऱ्याच्या कार्यालयात बसावे लागत आहे.
विद्या प्राधिकरणाच्या इमारतीच्या नूतनीकरणावर कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करण्यात आली. एवढा पैसा खर्च करूनही संचालक कार्यालयाला बुरशी लागली असून, शौचालयाची दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे डासांचा उपद्रवही वाढला आहे. या समस्यांमुळे गेल्या महिन्यापासून संचालक कार्यालय वापराविना धूळखात पडले आहे. “आयएएस’ दर्जाच्या संचालकांना या कार्यालयात बसवेना, अशी अवस्था आहे.
विद्या प्राधिकरणाला अभ्यासक्रम निर्मितीच्या बदल्यात बालभारतीकडून रॉयल्टी मिळणार होती. मात्र या रॉयल्टीच्या बदल्यात बालभारतीमार्फत प्राधिकरणाची इमारत व आवार सुशोभीकरणाचे काम करून देण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार सर्व प्रक्रिया राबवून 14 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला. ठेकेदाराने मुदतीत काम केलेच नाही. पाच वर्षे देखभालीची जबाबदारीही संबंधित ठेकेदारालाच देण्यात आली.
नूतनीकरण करुन संचालकासाठी आलिशान कार्यालय करण्यात आले. यासाठी अवाढव्य खर्चही झाला. मात्र या कार्यालयाचीही दूरवस्था झाली. दुरुस्ती झाली असली तरी अद्यापही संचालक या कार्यालयाचा वापर करत नाहीत. ते सहसंचालकांच्या कार्यायलयात बसतात.
इमारतीची काही कामे अर्धवट आहेत. कामाच्या दर्जाबाबत अजूनही ओरड सुरू आहे. अर्धवट पडलेली कामे पूर्ण करून देण्याबाबत बालभारतीला पत्रही पाठविण्यात आले आहे. मात्र त्याची दखल घेतलेली दिसत नाही.
संचालकांची बदली होणार?
विद्या प्राधिकरणाचे संचालक पद हे “आयएएस’ दर्जाचे पद नाही. मात्र तरीही राज्य शासनाने या पदावर ऑगस्ट 2021 मध्ये एम. देवेंद्र सिंह यांची नियुक्ती केली. या संचालकांचा विविध “थाट’ सांभाळावा लागत असल्याने काही अधिकारी, कर्मचाऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. दरम्यान, संचालकांची बदली होणार असल्याची काही महिन्यांपासून सुरू आहे.