मुंबई – जालन्यातील अंतरवाली सराटी गावामध्ये मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरु होतं. मात्र उपोषणकर्ते आणि पोलिसांमध्ये वाद झाला. त्याचं रुपांतर झटापटीत झालं. त्यानंतर तिथं दगडफेक झाली.
पुढे आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार केला. हे कमी म्हणून की काय हवेत गोळीबारही केला. पोलिसांच्या या कारवाईविरोधात राज्यभर संताप व्यक्त होतोय.
आंदोलनकर्त्यांवर झालेल्या लाठीचार्जचे पडसाद आता संपूर्ण राज्यभरात उमटताना दिसत आहेत. राजकीय वर्तुळातून यावर प्रतिक्रिया येत असून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करण्यास सुरुवात केली आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (दि. 2) जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावातील मराठा आंदोलनस्थळाला भेट दिली. यावेळी त्यांनी शिंदे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकीकडे मराठा आंदोलकांशी चर्चा केली. तर दुसरीकडे आंदोलकांवर लाठीचार्ज केला. आंदोलकांनी कायदा हातात घेतला नव्हता, त्यामुळे बळाचा वापर करण्याची गरज नव्हती, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे.
यावेळी पवार म्हणाले, “मराठा आंदोलकांना मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही. शब्द न पाळल्यामुळे आंदोलन सुरू करण्यात आले. एकीकडे चर्चा केली, तर दुसरीकडे लाठीचार्ज केला.
आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला. आंदोलनस्थळी मोठ्या संख्येने पोलिसांची कुमक आणण्यात आली होती. अंतरवाली सराटी गावात घडलेले घटना दुर्दैवी आहे, असे पवार म्हणाले.
दरम्यान, या प्रकरणी 16 आरोपीसह 300 ते 350 अज्ञात लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत. जालन्यातील गोंदी पोलीस ठाण्यात त्यांच्यावर कलम 307, 333 यांसह सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान केल्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आलेत.
यातील 16 आरोपींची ओळख पटली आहे. पोलिसांना कट करून जिवे मारण्याचा प्रयत्न करणे, यासह खासगी आणि सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान केल्याप्रकरणी प्रशासनाकडून आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आलेत.