पाल्लेकेले :- आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत आज पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत व पाकिस्तान यांच्यात साखळीतील लढत होत आहे. प्रदीर्घ कालावधीनंतर होत असलेल्या या सामन्याकडे संपुर्ण क्रिकेट जगताचे लक्ष लागले आहे.
भारत व पाकिस्तान यांच्यात झालेला नाणेफेकीचा कौल हा भारताच्या बाजूनं लागला आहे. कर्णधार रोहित शर्मानं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
पहिल्या डावातील 4.2 षटकांनंतर पावसामुळे सामना थांबवण्यात आला आहे. संपूर्ण मैदान कव्हर्सने झाकण्यात आले आहे. आज मुसळधार पाऊस अपेक्षित होता. अशा परिस्थितीत आता निसर्गाने आपला खेळ दाखवायला सुरुवात केली आहे.
4.2 षटकांनंतर भारताने एकही विकेट न गमावता 15 धावा केल्या आहेत. सध्या रोहित शर्मा 18 चेंडूत दोन चौकारांच्या मदतीने 11 धावांवर तर शुभमन गिल आठ चेंडूत खाते न उघडता मैदानात आहे.
पावसामुळे सामना रद्द झाल्यास?
दरम्यान,या सामन्यात पावसाचा व्यत्यय येणार असल्याचे हवामान खात्याने वर्तवले आहे. गेले दोन दिवस येथे वारंवार पाऊस पडत आहे. त्यामुळे हा सामना पूर्ण 50 षटकांचाच होणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सामना किमान 20 षटकांचा खेळवण्यात यश आले तर निकाल हाती येणार आहे. मात्र, ते देखील शक्य झाले नाही व सामना रद्द झाला तर दोन्ही संघांना गुण वाटून दिले जातील. अशा स्थितीत सलामीच्या लढतीत नेपाळचा पराभव केलेला पाकिस्तानचा संघ सुपर फोरसाठी पात्र ठरेल मात्र, भारतीय संघाला पात्र होण्यासाठी नेपाळविरुद्धचा सामना जिंकावाच लागेल.
दोन्ही संघाचे Playing 11 खालीलप्रमाणे…
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
पाकिस्तान : फखर जमान, इमाम-उल-हक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), आगा सलमान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ.