मुंबई – रत्नागिरीतील बारसू येथे रिफायनरी प्रकल्प घाईत करू नका, असा सल्ला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारला दिला आहे. तसेच, प्रकल्पाला विरोध करणाऱ्या स्थानिकांशी चर्चा करूनच पुढे जावे, अशी सूचनाही त्यांनी केली आहे.
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज शरद पवारांची भेट घेतली.
या भेटीबाबत माहिती देताना पत्रकार परिषदेत शरद पवारांनी सांगितले की, माझी सूचना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मान्य केली आहे. त्यानुसार उद्या बारसू प्रकल्पाला विरोध करणाऱ्या आंदोलक आणि शासकीय अधिकाऱ्यांची बैठक होत आहे. या बैठकीत अधिकारी प्रकल्पाबाबत स्थानिक अधिकाऱ्यांना समजावून सांगणार आहेत. त्यातून सर्वांना मान्य असा तोडगा निघाला तर चांगलेच आहे. अन्यथा इतर पर्यायांचा शोध घ्यावा लागेल.
पवार पुढे म्हणाले, बारसू येथे रिफायनरी प्रकल्पासाठी जमिनीची केवळ चाचपणी सुरू आहे. कुणाचीही जमिन अजून ताब्यात घेतली नाही, अशी माहिती मला सामंत यांनी दिली. तसेच, याबाबत आम्ही लोकांची समजूत घातल्यावर त्यांचा आता विरोध नाही, असेही सामंतानी मला सांगितले. त्यावर प्रकल्प करण्याबाबत घाईघाईने कोणतीही भूमिका घेऊ नका, अशी सूचना आपण त्यांना दिल्याचे पवारांनी म्हटले आहे.
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या निवास्थानी बुधवारी भेट घेतली आहे. बारसूमध्ये आज काय परिस्थिती आहे, काल ज्या महिलांना अटक करण्यात आली होती. त्यांना सोडून दिले आहे याबाबत शरद पवार यांना माहिती दिल्याचे या भेटीनंतर उदय सामंत यांनी सांगितले आहे. विशेष म्हणजे दोन्ही नेत्यांमध्ये काल फोनवही चर्चा झाली होती.