विश्रांतवाडी – महात्मा बसवण्णांनी “कायकवे कैलास” म्हणजे श्रम हाच कैलासाला जाणारा मार्ग आहे, असे तत्त्व १२ व्या शतकात सांगितले होते. त्यांच्या तत्त्वानुसार प्रत्येकाने आपल्या क्षेत्रात प्रामाणिकपणे काम (श्रम) करणे आवश्यक आहे. त्यामुळे व्यक्ती, समाज, देश हा आत्मनिर्भर होऊ शकतो. तसेच श्रम करणाऱ्या प्रत्येकाला शारीरिक व मानसिक स्थैर्य लाभते, असे प्रतिपादन शरण साहित्याचे संशोधक तथा लेखक प्रा.डॉ.भीमराव पाटील (लातूर) यांनी केले.
धानोरी येथील भैरवनगरमधील शिवयोगी प्रतिष्ठाणच्यवतीने जगतज्योती समतानायक महात्मा बसवण्णा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रा.डॉ.पाटील बोलत होते. डीआरडीओचे संचालक शास्त्रज्ञ डॉ. ए. जी. नगरकर यांचे अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला.
धानोरी मुख्य रस्त्यावरील शिवयोगी चौकात संपन्न झालेल्या कार्यक्रमप्रसंगी सन मराठी चॅनलवर प्रसारित होणाऱ्या “सुंदरी” मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री आरती बिराजदार, भाजपचे युवानेते सुरेंद्र पठारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते विनोद पवार, शशिकांत टिंगरे, स्वराज्य संघटनेचे प्रदेश सरचिटणीस धनंजय जाधव, पुणे इंटरनॅशनल स्कुलच्या उपाध्यक्ष ऍड.रेणुका चलवादी, सामाजिक कार्यकर्ते राजेश जाधव, सुधाकर झरेकर, संतोष सातपुते, जितेंद्र कराळेकर, गोपाळ पाटील, शांताराम खलसे, अजित(बंटी) जंगम, पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरात लिंगायत चळवळीत कार्यरत असणारे प्रमुख कार्यकर्ते तसेच धानोरी, टिंगरेनगर, लोहगाव, विश्रांतवाडी, कळस परिसरातील लिंगायत बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या बसवराज कणजे, नरसिंग मुळे, अनंत सिंदळकर, सिद्धरामेश्वर नावदगिरे, निलकंठ पाटील-ताकबीडकर, ऍड. विशाल सोनावने, डॉ.प्रमोद पाटील, दिपशिखा चौबे, दुर्गेश जंगम यांचा शाल, श्रीफळ, गुलाबपुष्प व सन्मानचिन्ह देऊन यथोचित गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नागनाथ ढोले यांनी तर सूत्रसंचालन सुनील समाने यांनी केले. प्रतिष्ठाणचे अध्यक्ष गुरुनाथ(आण्णा) बिराजदार यांनी आभार मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगेश जोगदंड, सुशील देटे, अरुण बिराजदार, महेश सगरे, भीमराव माने, श्रीकांत बिराजदार, सिद्धार्थ तरकसे, संदीप हत्तुरे, नरेंद्र बिडवे, महेश घडमोडे, संजय कोकीळकर, गौरव रणपिसे तसेच गणेश मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.