मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील वाढीव वीज बिल प्रश्नाविषयी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी राज्यपालांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा सल्ला घेण्यास राज ठाकरे यांना सांगितले. यावरून शरद पवार हेच राज्य चालवतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बोलून काही उपयोग नाही, अशी खोचक टीका भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केली.
चंद्रकांत पाटील म्हणाले कि, उद्धव ठाकरे घराबाहेर पडत नाही. कदाचित मी खुर्चीत बसतो. तुम्ही सत्ता चालवण्याचे कंत्राट घ्या, असा उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमध्ये करार झाला असावा.
सध्या लोकांना शरद पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सहज उपलब्ध होतात. त्यामुळे उद्धव ठाकरेंना कशाला भेटायचे अशी नागरिकांची भावना झाली आहे. ही वस्तुस्थिती आहे.
तसेच, उद्धव ठाकरे यांना राज्यातील प्रश्नांबाबत मी अनेकदा पत्रे लिहिली. पण त्यांनी माझ्या एकाही पत्राला उत्तर दिले नाही, असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हंटले आहे.
ठाकरे सरकार फार कुंथत कुंथत चालले असल्याची टीका राज ठाकरे यांनी केली होती. यावरील प्रश्नाला उत्तर देताना चंद्रकांत पाटील म्हणाले, राज ठाकरे खूपच स्पष्ट बोलतात. त्यांना स्पष्ट बोलण्याची सवय आहे.