Sharad Pawar : शुक्रवारी कर्जतमध्ये अजित पवार ( Ajit Pawar ) गटाचं वैचारिक मंथन शिबिर पार पडलं. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना थेट लक्ष्य केलं होतं. पण, शरद पवारांकडून अद्याप कुठलीही प्रतिक्रिया आली नव्हती. आता, शरद पवार यांनी पहिल्यांदाच यावर भाष्य केलं आहे. “काहींनी टीका-टिप्पणी केली. पण, खूप विचार करण्याची गरज नाही,” असं शरद पवारांनी ( Sharad Pawar ) म्हटलं आहे.
नुकतंच पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालय येथे शरद पवार ( Sharad Pawar ) गटाच्या राज्यभरातील पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी राज्यातील विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. तसेच शरद पवारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिल्याचं दिसून आलं.
प्रफुल्ल पटेल यांनी आपण पुस्तक लिहून सर्व घटनांविषयी सविस्तर लिहू, असा इशारा दिला होता. त्यावर शरद पवारांनी टोला लगावला. प्रफुल्ल पटेल यांच्या दिल्लीतील घरावर ईडीने का कारवाई केली होती ते सुद्धा लिहावं, असा टोला शरद पवारांनी लगावला.
अजित पवारांच्या आरोपांवर बोलताना शरद पवार काय म्हणाले, ‘अजित पवारांनी राजकीय निर्णय घेतला, तो त्यांचा अधिकार आहे. फक्त तक्रार एकच आहे की, त्यांना आता निर्णय घेण्याऐवजी निवडणुकीचा फॉर्म भरला.
त्यावेळी राष्ट्रवादीच्या नावाने घेतला. अजित पवारांना देण्यात आलेलं तिकीट हे जयंत पाटील किंवा माझ्या सहीचं असेल. लोकांच्या समोर राष्ट्रवादीसाठी मते मागितले. त्यानंतर त्याच्याशी विसंगत भूमिका घेणे मला मान्य नाही, अशी भूमिका शरद पवारांनी स्पष्ट केली.
अजित पवारांनी दावा केला की, तुम्ही अजित पवारांना सांगितलं की, तुम्हाला जी भूमिका घ्यायची आहे ती भूमिका घ्या, मी राजीनामा देतो, त्यांच्या या दाव्याबाबत शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. “मी राजीनामा देतो याचं कारण काय? मी पक्षाचा अध्यक्ष होतो.
सामूहिक निर्णय झाला होता. सामूहिक निर्णयानंतर काही वेगळं करण्याचं कारण नव्हतं. आमची स्वच्छ भूमिका होती की, भाजपसोबत जायला नको”, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं.