मुंबई: लॉकडाऊनमुळे अडकलेले अनेकजण घरी जाण्यासाठी अनेक युक्त्या करत आहेत. एका बहाद्दराने तर मुंबईतून-उत्तर प्रदेशात घरी जाण्यासाठी चक्क 25 टन कांदा खरेदी केला. या कांद्याची किंमत 2 लाख 32 हजार इतकी आहे. प्रेमा मूर्ती पांडे असं या बहाद्दराचं नाव आहे. हा कांदा त्याने एका ट्रकमध्ये भरुन उत्तर प्रदेशातील प्रयागराजला नेला. जीवनावश्यक वस्तूंची गाडी असल्यामुळे वाटेत कुणीही या ट्रकला रोखलं नाही.
प्रेमा मूर्ती पांडे हे मुंबई विमानतळावर कामाला आहेत. लॉकडाऊनचा पहिला टप्पा पांडे यांनी मुंबईत घालवला. पण लॉकडाऊन वाढण्याच्या शक्यतेने त्यांनी आयडिया लढवली. ती म्हणजे जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणे. प्रेमा पांडेंनी नाशिकजवळील पिंपळगावातून मिनी ट्रक भाड्याने घेऊन आधी 10 हजार रुपयांचे कलिंगड विकत घेतले आणि ट्रक मुंबईला पाठवला.
यावरुन प्रेमा पांडेंना कल्पना आली की अत्यावश्यक वस्तूंच्या गाड्या अडवल्या जात नाहीत. त्यांनी दरम्यानच्या काळात मुंबईतील व्यापाऱ्याशी कांद्याबाबत करार केला. पिंपळगाव कांदा मार्केटबद्दल त्यांना माहिती होती. त्यामुळे त्यांनी 25,520 किलो कांदा खरेदी केला. त्याला प्रतिकिलोसाठी 9 रु10 पै प्रमाणे एकूण 2.32 लाख रुपये दिले.
मग त्यांनी 77 हजार 500 रुपये देऊन ट्रक भाड्याने घेऊन, त्यामध्ये कांदा भरला. हा कांदा घेऊन ते 20 एप्रिलला अलाहाबादकडे रवाना झाले. तब्बल 1200 किमी प्रवास करुन ते ट्रकने 23 एप्रिलला अलाहाबाद अर्थात प्रयागराजला पोहोचले. हा कांदा घेऊन ते होलसेल मार्केटला गेले. मात्र मार्केटमध्ये कोणीही रोख रक्कम देण्यासाठी तयार नसल्याने प्रेमा पांडेंनी हा ट्रक आपल्या गावी कोटवा मुबारकपूरला नेला. दरम्यान, प्रेमा पांडेची तपासणी करुन त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आलं आहे. कांद्याची विक्री झाली नाही, पण आपण घरी पोहोचलो याचा आनंद त्यांना आहे.