लाखनगाव,(वार्ताहर) – कांदा काढणी चालू असून मात्र, कांद्याला बाजारभाव नसल्याने शेतकऱ्यांच्या हातात काही पडत नसल्याने शेतकरी वर्ग चिंतेत पडला आहे. आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात सध्या कांदे काढणीला वेग आला असून उन्हाची तीव्रता वाढल्याने आणि मजुरांची टंचाई निर्माण झाल्याने कांदा काढणी करताना शेतकऱ्यांची मात्र धावपळ होत आहे.
सध्या मोठ्या प्रमाणावर कांद्याची लागवड केली जाते. या लागवड केलेल्या कांद्याची काढणी पूर्व भागात सुरू झाली असून कांदा काढण्याच्या कामांना वेग आला आहे. ऊन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणावर असतानाही एकाच वेळी कांदे काढणी सुरू झाली आहे. त्यामुळे मजुरांची टंचाई निर्माण झाली आहे. कांद्याची पात उन्हामुळे वाळून गेल्याने सर्वच शेतकऱ्यांची कांदा काढणी करण्यासाठी लगबग चालली आहे.
परिणामी कांदा काढण्यासाठी मजुरांना मागणी जास्त तर मजुरांची संख्या कमी, यामुळे कांदा काढणी करताना मजूर टंचाई भेडसावत आहे. सध्या मजुरांना २५० ते ३०० रुपये मजुरी तर शंभर रुपये गाडीभाडे अशा पद्धतीने साडेतीनशे रुपये मजुरी द्यावी लागत आहे. त्याचप्रमाणे हे मजूर साडेदहा ते अकरा वाजता शेतात येतात.
त्यानंतर दुपारी एक तास जेवणाची सुट्टी आणि संध्याकाळी पाच वाजले की मजुरांची सुट्टी होते. त्यामुळे मजुरीच्या मानाने काम होत नाही, अशी काही शेतकऱ्यांची भावना आहे. परंतु मजूरच मिळत नसल्याने मिळेल त्या भावात मजूर घेऊन कांदा काढणी करावी लागत आहे.
उन्हाचा फटका…
उन्हाची तीव्रता ही मागील आठ ते दहा दिवसांत मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. या उन्हाचा फटका हा कांदा काढणीसाठी होत असून, उन्हामुळे कांदा काढण्याचा वेग मंदावला आहे. परिणामी मोठ्या प्रमाणावर उन्हाचा सामना करून शेतकरी कांदा काढण्याची कामे करून घेत आहेत.
परंतु शेतकऱ्यांचा कांद्यासाठी झालेला भांडवली खर्च झालेले मजुरी व सध्या कांद्याला मिळत असणारा भाव यामुळे शेतकऱ्यांच्या हातात काही पडत नसल्याने शेतकरी वर्ग मात्र नाराज असून शेतकरी वर्ग मात्र कांद्याला बाजारभाव नसल्याने वैतागलेला दिसून येत आहे.