देशभरात एनआरसी लागू करण्याच्या भूमिकेचे समर्थन
पाटणा : राष्ट्रीय नागरिक नोंदणीपुस्तक (एनआरसी) देशभरात लागू करण्याविषयी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मांडलेल्या भूमिकेचे भाजपने जोरदार समर्थन केले आहे. भारत म्हणजे कुठली धर्मशाळा नव्हे, असे त्या पक्षाने म्हटले आहे.
जगातील सर्व भागांमधील लोकांना भारतात येण्याची परवानगी आहे. मात्र, वैध पासपोर्टच्या आधारे त्यांनी यावे. तसेच, व्हिसामध्ये नमूद केलेल्या मुदतीपलीकडे त्यांनी भारतात राहू नये. अवैध वास्तव्यावर कारवाई व्हायलाच हवी, असे भाजपचे प्रवक्ते शाहनवाज हुसेन बिहारच्या मधेपुरात पत्रकारांशी बोलताना म्हणाले. भारत म्हणजे काही कुणीही प्रवेश करावा आणि इच्छेनुसार कितीही दिवस रहावे अशी मुभा देणारी धर्मशाळा नाही, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. जम्मू-काश्मीरशी संबंधित घडामोडींवरून मोदी सरकारवर टीका करत असल्याबद्दल हुसेन यांनी कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. भारताची बाजू चुकीची ठरवण्यासाठी पाकिस्तानला दारूगोळा पुरवण्याचे काम राहुल करत आहेत. राष्ट्रीय हितांना बाधा पोहचवण्याचे काम राहुल यांनी दुसऱ्यांदा केले. याआधी सर्जिकल स्ट्राईकबाबत ते पुरावे मागत होते, असे हुसेन यांनी म्हटले.