मित्रपक्षांमध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना इशारा
पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री आणि जेडीयूचे अध्यक्ष नितीश कुमार यांनी शुक्रवारी राज्याच्या नेतृत्वाबाबत वेगळा सूर आळवणाऱ्या मित्रपक्ष भाजपच्या नेत्यांना फटकारले. मित्रपक्षांमध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करणारे अडचणीत येतील, असा इशाराही त्यांनी दिला.
बिहारमध्ये जेडीयू, भाजप आणि लोजपचा समावेश असणाऱ्या एनडीएची सत्ता आहे. त्या आघाडीचे प्रमुख घटक असणाऱ्या जेडीयू आणि भाजपमध्ये काही वेळा धुसफूस होताना दिसते. अलिकडेच भाजपच्या काही नेत्यांनी पुढील मुख्यमंत्री आपल्या पक्षाचा असावा, अशी भूमिका मांडली. त्यामुळे भाजप आणि जेडीयूमध्ये दरी निर्माण झाल्याच्या चर्चांना उधाण आले. त्या चर्चा नितीश यांनी जेडीयूच्या राज्य परिषदेच्या बैठकीत फेटाळून लावल्या.
एनडीएमध्ये कुठलाही बेबनाव नाही. पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत 200 हून अधिक जागा पटकावत एनडीए बिहारची सत्ता राखेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्याचवेळी बिहारचे नेतृत्व भाजपकडे घेण्याची मागणी करणाऱ्या त्या पक्षाच्या नेत्यांनाही नितीश यांनी अप्रत्यक्षपणे कानपिचक्या दिल्या. माझ्या विरोधातील प्रत्येक वक्तव्यावर प्रतिक्रिया देऊ नये, अशी सूचनाही त्यांनी जेडीयूच्या प्रवक्त्यांना केली.