छत्रपती संभाजीनगर- “गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या तिघांनी 13 लोकांची हत्या केली, असा गंभीर आरोप एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे. महाराष्ट्र सरकारने अलीकडेच आप्पासाहेब धर्माधिकारी यांना “महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार दिला. हा पुरस्कार सोहळा रखरखत्या उन्हात आयोजित केला होता.
या कार्यक्रमाला लाखो लोक उपस्थित होते. कार्यक्रमस्थळी लोकांना भरउन्हात तब्बल तीन तास बसावे लागले. यामध्ये 13 लोकांचा उष्माघाताने मृत्यू झाला. याच पार्श्वभूमीवर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी हे गंभीर आरोप केंद्रीय मंत्री शहा व राज्य सरकार केले आहेत.
जलील म्हणाले की, आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे काम खूप मोठे आहे. त्यांना “महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार मिळाला, यासाठी मी त्यांचे अभिनंदन करतो. पण हा पुरस्कार देण्यासाठी जो कार्यक्रम घेण्यात आला, या कार्यक्रमाला धर्माधिकारी यांचे 20 लाख अनुयायी बोलविण्यात आले होते. त्यांच्या मतांसाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता.
या कार्यक्रमासाठी 14 कोटी रुपये खर्च केले, असे मला सांगण्यात आले. या कार्यक्रमात स्वत:ला घाम येऊ नये, म्हणून तुम्ही शेडमध्ये बसले होते. पण लाखोंच्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या गोर-गरीब अनुयायांना तुम्ही उन्हात बसवले. यामध्ये 13 लोकांचा बळी गेला, हा बळी गेला नाही तर हत्या झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी या हत्या केल्या, असे दुजोरा देत म्हटले आहे.
प्रत्येकी 50 लाख द्या
जलील लोकांना उद्देशून म्हणाले की, तुम्ही गरीब लोक आहात, तुम्ही मेलात तर काय फरक पडणार नाही. सरकारला उद्देशून जलील पुढे म्हणाले, ते आता सरकारी तिजोरीतून पाच लाख रुपये देतो असे म्हणाले. पण तुम्हाला लाज वाटायला हवी. माणसाची किंमत तुम्ही पाच लाख रुपये इतकी केली. तुम्हाला थोडीतरी लज्जा असेल तर पीडित कुटुंबियांना प्रत्येकी 50 लाख रुपये मदत करा.
आपल्या राजकीय स्वार्थासाठी तुम्ही लोकांचा बळी घेतला. यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी तर राजीनामा द्यायला हवा होता. हीच घटना परदेशात घडली असती तर व्यासपीठावर बसलेल्या तिन्ही जणांना राजीनामा द्यावा लागला असता. पण तुम्ही राजीनामा देणार नाहीत, असेही जलील यांनी पुढे म्हटले.