नगर (प्रतिनिधी)– शहरातील कचरा संकलन व वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला असून साठलेल्या कचऱ्यामुळे तुंबलेल्या गटारीचे घाण पाणी आता रस्त्यावर वाहू लागले आहे. कोणतीही यंत्रणा नसतांनाही महापालिकेने कचरा संकलनाचा ठेका श्रीजी एजन्सीला दिला. गेल्या पाच महिन्यांपासून शहरभर कचरा साठल्यानंतर लाचार झालेल्या महापालिकेने ठेकेदाराला घंटागाड्या वाढविण्याचे आदेश दिले. त्यानुसार ठेकेदाराकडून 35 गाड्यांची खरेदी होणार असून महिन्याभरानंतर शहरातील कचरा संकलनाचा विषय मार्गी लागणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
सध्या महापालिका नगरकरांना सेवा व सुविधा देण्यासाठी सर्व कामे ठेकेदारांमार्फत करीत असल्याचे चित्र आहे. अर्थात हे ठेके नावाला अन्य संस्थांकडे असली तरी प्रत्यक्षात कार्यवाही व कामकाज स्थानिक करीत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन या ठेकेदारांपुढे लाचार झाली असून नगरकरापेक्षा या ठेकेदारांचे हित जोपासण्याचा प्रयत्न होत आहे.
त्यामुळे कचरा संकलना व वाहतुकीचा प्रश्न शहरात गंभीर झाला आहे. कचरा संकलन करणाऱ्या ठेकेदारांकडे यंत्रणा नसतांनाही हा ठेका देण्यात आला. घंटागाड्या नसल्याने गेल्या पाच महिन्यांपासून नागरिक वैतागून कचरा रस्त्यावर टाकत आहे. महापालिका प्रशासन देखील हतबल होऊन कचरा रस्त्यावर पाहत अहो. अखेर याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेससह विरोधी भाजपच्या नगरसेवकांनी आवाज उठविल्यानंतर महापालिकेने ठेकेदाराला घंटागाड्या वाढविण्याचे आदेश दिले.
मागील महिन्यात 20 नवीन गाड्या आल्यानंतर आता आणखी 35 गाड्यांची खरेदी होणार आहे. येत्या एक ते दीड महिन्यात या गाड्या ताफ्यात दाखल होणार आहेत. तसेच मनपाने खरेदी केलेले नवीन चारही कॉम्पॅक्टर कचरा संकलन व वाहतुकीसाठी वापरण्यास सुरुवात केल्याचे ठेकेदार संस्थेकडून सांगण्यात आले.
श्रीजी एजन्सी या संस्थेमार्फत शहरात कचरा संकलन व वाहतुकीचे काम सुरू आहे. मनपाने संस्थेला दिलेल्या 65 घंटा गाड्यांपैकी 15 ते 20 गाड्या बंद अवस्थेत आहेत. ठेका घेतानाच याबाबत मनपाला संस्थेकडून कळवण्यात आले होते. मात्र, अद्यापही या गाड्यांची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. दरम्यानच्या काळात ठेकेदार संस्थेने नवीन 20 गाड्या सेवेत दाखल केल्या. मात्र, या गाड्या अपुऱ्या पडत असल्याने कचरा संकलन कामात विस्कळीतपणा आला आहे. मनपा प्रशासनाने ठेकेदार संस्थेला गाड्यांची संख्या वाढवण्याचे आदेश दिले होते.
कचरा संकलनासाठी स्वतंत्र यंत्रणा
नवीन 35 गाड्या खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या एक ते दीड महिन्यात टप्प्याटप्प्याने या गाड्या सेवेत दाखल होणार आहेत. शहरात ठिकठिकाणी पडलेला कचरा उचलण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून, मागील दोन ते तीन दिवसात 159 ठिकाणी पडलेला कचरा उचलण्यात आला. दरम्यान, शहरात सध्या 72 घंटागाड्या, 10 कॉम्पॅक्टर, दोन टेम्पो व काही ट्रॅक्टरद्वारे कचरा संकलनाचे काम सुरू असल्याचे ठेकेदार संस्थेकडून सांगण्यात आले.