वाळूची तस्करी करणारे सातजण जिल्ह्यातून तडीपार
सातारा – मेढा व वाठार पोलीस ठाण्याच्या हद्दीत सरकारी कामात अडथळा आणून दरोडयासह वाळू तस्करी करणाऱ्या टोळीला जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी एक वर्षासाठी जिल्ह्यातून तडीपार केले आहे. मयुर विकास जाधव (टोळी प्रमुख, रा. शेते, ता. जावळी), रोहित शंकर मोरे (रा. गोपाळपंताची वाडी, ता. जावळी), मंगेश चंद्रकांत शिर्के (रा. म्हसवे, ता. जावळी) भूषण संभाजी भोईटे (रा. विद्यानगर, फलटण), अकबर बाबूलाल बागवान (रा. लोणंद, ता. खंडाळा), संदीप किसन वाघ (रा. अमृतवाडी, ता. वाई), आकाश शिवाजी सावंत (रा. चिंधवली, ता. वाई) अशी तडीपार केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, वरील संशयितांनी जावळी व कोरेगाव तालुक्यात सरकारी कामात अडथळा आणून दरोड्यासह वाळूचोरीचे गुन्हे केलेले आहेत. या टोळीतील सदस्यांना वेळोवेळी सुधारण्याची संधी देऊनही त्यांच्या वर्तनात सुधारणा झाली नव्हती. त्यांचा सर्वसामान्य जनतेस उपद्रव होत होता. त्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची लोकांकडून मागणी होत होती. त्यामुळे पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन 1951 चे कलम 55 अन्वये सातारा जिल्हा हद्दीतून एक वर्षे या कालावधीकरीता हद्दपार केले आहे. सातारा जिल्हयात अशाच प्रकारे समाजामध्ये भीती, दहशत पसरविणाऱ्या गुंडांचे व चोऱ्या, मारामारी, करणाऱ्याच्या विरुध्द कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे सातपुते यांनी सांगितले.