जळोची -आपल्या मतदार संघातील नागरिकांची विविध कामे व समस्यांचा निपटारा जागच्या जागेवर करणारे नेते म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाहिले जाते.आपल्या मतदार संघातील नागरिकांना त्यांची कामे घेऊन पुणे, मुंबई सारख्या ठिकाणी यावे लागू नये म्हणून मागील अनेक वर्षांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीत जनता दरबार भरवत असतात. मागील काही दिवस बंद असलेला जनता दरबार रविवारी (दि. 17) पासून सुरू झाला आहे, त्यामुळे तालुक्यातील असंख्य नागरिक आपली कामे घेऊन जनता दरबारात दाखल झाली आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार रविवारी (दि. 17) बारामती दौऱ्यावर होते. विद्याप्रतिष्ठान येथे ते जनता दरबार घेत असतात. जनता दरबारात शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांबरोबरच महिला, पुरुष व वयोवृद्ध नागरिक मोठ्या संख्येने आपली कामे घेऊन पवार यांच्याकडे येत असतात. यावेळी सर्व विभागातील शासकीय अधिकारी वर्ग उपस्थित असतो. नागरिकांचे ज्या विभागाकडे काम आहे. त्या विभागाच्या अधिकाऱ्यांकडे त्या नागरिकांचे निवेदन देतात आणि तत्काळ मार्ग काढण्याचे आदेश अजित पवार देत असतात. दरबारात येणाऱ्या शेवटच्या नागरिकाचे निवेदन घेऊन त्यावर कार्यवाही करेपर्यंत दरबार सुरू राहतो.
विशेष बाब म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार ज्यावेळी बारामती दौऱ्यावर असतात. त्यावेळी ते अनेक कार्यक्रम पार पाडत असतात. मात्र यावेळी देखील अनेक नागरिक आपली कामे घेऊन पवार यांच्याकडे येत असतात. चालू कार्यक्रमातही प्रत्येकाचे निवेदन घेऊन स्वतः वाचून संबंधित अधिकाऱ्याला बोलून त्या निवेदनाचा निपटारा जागच्या जागेवर करतात. मतदार संघातील अनेक नागरिक या जनता दरबाराला मोठ्या संख्येने हजेरी लावतात.