कापूरहोळ, (वार्ताहर)- शेतकऱ्यांसाठी आणि परिसरातील वाड्यावस्त्यांना पुरेशा दाबाने वीज पुरवठा होण्यासाठी केंजळ (ता. भोर) येथे ३३/११ केव्ही उपकेंद्र उभारणीसाठीच्या असलेल्या अडचणी दूर करून महावितरण ने तातडीने उपकेंद्र उभारावे. अन्यथा २० फेब्रुवारीला भोरच्या पूर्व भागातील १८ गावांमधील व वाड्यावस्त्यांवरील हजारो शेतकऱ्यांच्या वतीने पुणे सातारा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य चंद्रकांत बाठे यांनी दिला आहे.
केंजळ येथील गट नंबर ६८२ मधील ८० आर क्षेत्रामध्ये हे उपकेंद्र उभारण्याची कार्यवाही गेल्या दीड वर्षापासून सुरू आहे. तालुक्याच्या पूर्वेकडील १८ गावांच्या बागायती क्षेत्राला कमी दाबाने वीजपुरवठा होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. या प्रकल्पासाठी महावितरणने रुपये ६ कोटी टेंडर करून ठेवले आहे. उपकेंद्र व्हावे, यासाठी सर्व प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकारी पुणे, आयुक्त कार्यालय पुणे यांच्या मार्फत प्रधान सचिव मदत व पुनर्वसन मंत्रालय, मुंबई येथे पाठवला; परंतु मंत्रालयातून प्रस्ताव परत आला होता.
दरम्यान, आयुक्त कार्यालय पुणे येथून या प्रस्तावातील त्रुटींची पूर्तता करून प्रस्ताव पुन्हा प्रधान सचिव, महसूल विभाग यांच्याकडे गेला आहे. त्यावर अद्याप काहीच कार्यवाही होत नाही. भोरच्या पूर्व भागातील हजारो शेतकरी मागील दीड वर्षापासून वीज उपकेंद्र होणेसाठी प्रयल करीत आहेत. हा विषय शेतकऱ्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा आहे. शेतकरी यांचा संयम संपत चालला आहे. त्यामुळे वीज उपकेंद्र तातडीने उभारण्यात यावे, अशी मागणी माजी आदर्श जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत बाठे यांनी केली आहे.
शेतकऱ्यांचे दादांकडे लक्ष
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दि. ११ सप्टेंबर 2023 रोजी महावितरणची आढावा बैठक घेतली होती. त्यामध्ये उपकेंद्राच्या उभारणीचा विषय घेतला होता. भोर तालुक्याचा पूर्व भाग हा बागायती क्षेत्र म्हणून ओळखला जातो. यामधील १८ गावांना वीज ही कमी दाबाने मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. ही बाब निदर्शनास आणून दिली होती त्यावर लवकरच निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले होते.