नवी दिल्ली : मणिपूरमधील हिंसाचार काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाही. राज्य थोडं शांत झाले असे वाटत असतानाच पुन्हा इथे हिंसाचाराचे आगडोंब उफाळून येत आहे. दरम्यान, या ठिकाणी नुकत्याच झालेल्या गोळाबारामध्ये आतापर्यंत ८ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर यात १८ पेक्षा जास्त लोक गंभीररीत्या जखमी झाले असल्याचे सांगण्यात येत आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी मणिपूच्या बिष्णुपूरमध्ये आणि चुराचांदपूर जिल्ह्यामध्ये मागील काही तासांपासून दोन समूहांमध्ये सातत्याने गोळीबार होत आहे. यामध्ये किमान ८ जणांचा मृत्यू झाला आहे तर १८ पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. त्यासोबतच बिष्णुपूर जिल्ह्यातील खोराईंतकच्या पायथ्याशी आणि चुराचंदपूर जिल्ह्यातील चिंगफेई आणि खौसाबुंग भागात गोळीबार झाला. मंगळवारी खोइरेंटक भागात झालेल्या गोळाबारामध्ये एका 30 वर्षीय समाजसेवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. त्यानंतर या भागातील हिंसाचार वाढत गेल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
मंगळवारी बिष्णुपूरच्या नारायणसेना गावाजवळ झालेल्या हिंसाचारामध्ये दोघांचा मृत्यू झाला तर सहा जण जखमी झाले होते. दरम्यान इंडिजिनस ट्रायबल लीडर्स फोरम (ITLF) ने तात्काळ बंद देखील पुकारला. बुधवारी संध्याकाळी काही तासांच्या शांततेनंतर गुरुवारी (31 ऑगस्ट) सकाळी पुन्हा दोन गटांमध्ये गोळीबार सुरु झाला, त्याच तिघांनी प्राण गमावले. दरम्यान जरी काही जिल्ह्यांमध्ये बंद पुकारण्यात आला असला तरीही अत्यावश्यक सेवा या सुरुच राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
मणिपूर पोलिसांनी ट्वीट करत यासंबंधी अधिक माहिती दिली आहे. त्यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, कांगपोकपी, थौबल, चुराचंदपूर आणि इंफाळच्या काही भागांमध्ये सुरक्षारक्षकांनी शोध मोहीम राबवली आहे. या मोहिमेमध्ये शस्त्र, दारुगोळा, स्फोटके आणि इतर काही साहित्य सापडले आहे. सध्या मणिपूरमधील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये 130 अतिरिक्त पोलीस चौकी देखील स्थापन करण्यात आल्या आहेत. तर नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल आतापर्यंत 1,646 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.