इंदूर – ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी संघातील वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती का देण्यात आली याचा खुलासा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी केला आहे. येत्या काही दिवसांतच भारतात एकदिवसीय सामन्यांची विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा होत आहे. त्यासाठी संघातील नियमित कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहलीसारखे वरिष्ठ खेळाडू ताजेतवाने राहावेत, हाच हेतू ठेवत त्यांना विश्रांती दिल्याचे द्रविड म्हणाले.
आशिया करंडक स्पर्धा तसेच त्यापूर्वी झालेल्या विविध मालिकांमध्ये संघातील वरिष्ठ खेळाडू सातत्याने सामने खेळले आहेत. विश्वकरंडक स्पर्धा अवघ्या काही दिवसांवर आलेली असताना त्यांना कोणतीही दुखापत होऊ नये, तसेच पुरेशी विश्रांती मिळावी याच हेतूने त्यांना ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांसाठी संघातून विश्रांती देण्यात आली आहे.
तिसऱ्या सामन्यासाठी हे सगळे वरिष्ठ खेळाडू संघात परततील. या सामन्यानंतर काही दिवसांतच भारतीय संघाचे सराव शिबिरही होणार आहे. त्यासाठी मॅक प्रॅक्टिस असणेही गरजेचे आहे. त्यामुळे पहिले दोन सामने त्यांना संघात स्थान दिले गेले नाही व अखेरच्या सामन्यासाठी ते संघात परततील, असेही द्रविड म्हणाले.
विश्वकरंडक डोळ्यासमोर ठेवतच पहिले दोन एकदिवसीय सामने लोकेश राहुलच्या नेतृत्वाखाली, तर तिसरा एकदिवसीय सामना रोहितच्या नेतृत्वाखाली खेळवला जाणार आहे. रोहित व कोहलीसह उपकर्णधार हार्दिक पंड्या तसेच फिरकी गोलंदाज कुलदीप यादव हे 27 सप्टेंबर रोजी राजकोट येथे होणाऱ्या मालिकेतील शेवटच्या सामन्यासाठी संघात सहभागी होतील.
कोहली व रोहितसह अन्य वरिष्ठ खेळाडू विश्वकरंडक स्पर्धेदरम्यान शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त असणे गरजेचे आहे. त्यांना स्वतःची तयारी कशी करायची हे माहिती आहे. जरी त्यांना विश्रांती देण्यात आली असली तरीही सपोर्ट स्टाफ सातत्याने त्यांच्या संपर्कात आहे.
तिसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी भारतीय संघ – रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या, (उपकर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, लोकेश राहुल (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्सर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, महंमद शमी, महंमद सिराज.