पुणे (प्रतिनिधी) – विद्वेषाच्या भावना प्रबळ होत गेल्याने विचारवंतांची विभागणी होऊन, राजसत्ता ही विचारवंतांकडे किंवा साहित्यिकांकडे येण्याऐवजी धर्मसत्तेकडे जाणे पसंत करू लागली आहे, हे खेदजनक चित्र आहे. विचारवंतांनी डावे-उजवे आदी भेदभाव दूर सारून, एका व्यासपीठावर यावे. समाजाला एका सूत्रात बांधण्याचे काम करावे, असे मत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी व्यक्त केले.
साहित्यिक, समीक्षक व वक्ते डॉ. निर्मलकुमार फडकुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त पुणे येथील महाराष्ट्र साहित्य कला प्रसारणी सभा आणि सातारा येथील लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेच्यावतीने ज्येष्ठ समाजसेवक गिरीश प्रभुणे यांना जीवनगौरव पुरस्कार, “आचार्यदर्शन’ या ग्रंथासाठी डॉ. संभाजी मलघे, “माझी भाषणे, प्रसंग आणि आठवणी’ या ग्रंथासाठी प्रा. जे. पी. देसाई यांना साहित्य पुरस्कार आणि पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे यांनी सांस्कृतिक पुरस्काराने गौरविण्यात आले. त्याप्रसंगी प्रा. जोशी बोलत होते.
ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, महाराष्ट्र साहित्य कला प्रसारणी सभेचे कार्याध्यक्ष सचिन ईटकर, अध्यक्ष उद्धव कानडे, उपाध्यक्ष रवींद्र डोमाळे, लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिरीष चिटणीस व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रा. जोशी म्हणाले, पोटाला भाकरी देऊ न शकणारे शिक्षण निरुपयोगी आहे. कट्टरता ही विचारवंत व साहित्यिकांना न शोभणारी गोष्ट आहे. डॉ. कोत्तापल्ले म्हणाले, पूर्वीच्या काळात वेगवेगळ्या विचारधारांच्या चळवळींविषयी प्रत्येकाला आदर होता. दुसऱ्याचे विचार व कामाचा आदर करण्याचे औदार्य होते. काळाच्या ओघात त्याची जागा कट्टरतेने घेतली. त्यामुळे एकमेकांच्या कामाचा आदर करायचे आपण विसरलो आहोत.
सत्काराला उत्तर देताना प्रभुणे म्हणाले, पु. शि. रेगे, भालचंद्र नेमाडे, नागनाथ कोत्तापल्ले अशा साहित्यिकांच्या साहित्यामुळे माझ्या दृष्टिकोनाला सामाजिक कंगोरे मिळाले. उच्च शिक्षण घेतलेल्या तरुणांना आजही नोकऱ्या नाहीत. डॉ. मलघे, प्रा. देसाई व भोरे यांनी मनोगत व्यक्त केले. शिरीष चिटणीस यांनी प्रास्ताविक केले. उद्धव कानडे यांनी सूत्रसंचालन केले. सचिन ईटकर यांनी आभार मानले.