सोलापूर – शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते व सांगोलाचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे शुक्रवारी रात्री ९ वाजता सोलापुरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले.दोनच दिवसांपूर्वी त्यांच्यावर पित्ताशयाची शस्त्रक्रिया झाली होती.मृत्यूसमयी ते ९६ वर्षाचे होते.
सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातुन ११ वेळा विधानसभेत निवडून आले होते.द्रविड मुनेत्र कळघमचे नेते एम.करुणानिधी यांचा विक्रम माजी आमदार देशमुख यांनी मोडला होता.२००९ च्या निवडणुकीत विजय मिळवून करुणानिधी यांच्या पाठोपाठ दहाव्यादा आमदारकीची निवडणुक जिंकणारे देशमुख हे देशातील दुसरे आमदार होते.त्यांनी तब्बल ५४ वर्षे सांगोलाचे नेतृत केले.
गणपतराव देशमुख यांची वाटचाल
शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार गणपतराव देशमुख १५ मार्च १९६२ साली पहिल्यांदा आमदार झाले. आमदारकीमधून वेळ काढून वकिलीचे शिक्षण घेण्यास वेळ मिळाला नाही म्ह्णून त्यांचे वकिलीचे शिक्षण सुटले. आपल्या पहिल्याच आमदारकीच्या अभिभाषणावर भाषण देऊन त्यांनी यशवंतराव चव्हाण यांचीदेखील वाहवा मिळविली होती.
पुण्यात विध्यार्थी दशेत असताना त्यांच्यावर शेकापचे मोरे,जेधे,नाना पाटील,तुळशीदास जाधव यांचा प्रभाव पडत गेला. त्या काळात शंकरराव मोरे पुण्यात मार्क्सवादी विचारांचे अभ्यासवर्ग घेत असत. घरातून देशमुखी असणारे गणपतराव देशमुख या लोकांमुळे खऱ्या अर्थाने लोकांचे झाले.
निस्वार्थीपणे काम करण्याची शिकावं या नेत्यांनी दिली आणि त्यांना पुढे ठेऊनच ते सांगोल्यातून पहिल्यांदा आमदार झाले. ५० वर्षाहून अधिक काळ आमदारकी भोगली . या काळात ११ वेळा निवडून येण्याचा विक्रम त्यांनी केला. पण त्याहून महत्वाचे म्हणजे त्यांनी हे सर्व एकाच शेतकरी कामगार पक्षातून सिद्ध केले.
शेतकरी कामगार पक्ष हा एकेकाळचा राज्यातला मातब्बर पक्ष. राज्यातला प्रमुख विरोधी पक्ष असणारा शेकाप कधीही सत्तेत येऊ शकत होता. शंकरराव मोरे,नाना पाटील,सी. डी . देशमुख,केशवराव जेधे,माधवराव बागल,तुळशीदास जाधव अशा मातब्बरांचा शेकाप हा एकेकाळचा पक्ष. कधीकाळी नगरसारखा संपूर्ण जिल्हा लाल रंगाचा होता.
महाराष्ट्राच्या राजकारणात काँग्रेसनंतर सर्वात महत्वाचा शेकाप हा पक्ष होता. पण त्यानंतरच्या काळात पक्षाची उतरण सुरु झाली. हळूहळू पक्ष संपल्यात जमा झाला. जयंत पाटलांमुळे रायगड आणि गणपतराव देशमुख यांच्यामुळे सांगोल्यात शेकापचे अस्तित्व राहिले. त्यातही १९६२ नंतर महाराष्ट्रात झालेल्या इतक्या मोठ्या राजकीय उलथापालथीमध्ये गणपतराव लाल बावटाबरोबर प्रामाणिक व निष्ठेने राहिले.
कृष्ण नदीचे पाणी दुष्काळी भागाला मिळावे म्हणून नागनाथ अण्णा नाईकवाडी यांनी पाणी परिषदेच्या रूपाने एक लढा उभारला होता. त्यातही गणपाटबांचा सक्रिय सहभाग होता. टेम्भू योजनेचे पाणी आपल्या दुष्काळी सांगोला भागात आणण्यासाठी त्यांनी लढा दिला. गणपत आबा दोनवेळा मंत्री होते. मंत्रिपद गेल्याक्षणी त्यांनी सरकारी गाडीचा त्याग केला. आमदार म्हणून ते नेहमी एसटीने प्रवास करत होते. एसटीने प्रवास करणारे आमदार म्हणून आजही त्यांना ओळखले जाते.
गणपतरावांचा जन्म १९२७ सालचा. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी राजकारणातून सेवानिवृत्ती घेतली. मात्र १९६२ सालापासून महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडून येणारे सांगोल्याचे आमदार गणपतराव देशमुख . दोन अपवाद सोडले तर ते निवडणुकीत पराभूत झाले नाहीत. अगदी मोदी लाटेतसुद्धा ते निवडून आले.
१९६२ पासून दोन अपवाद सोडले तर ते कधीच सत्तेत नव्हते. पुलोदच्या कार्यकाळात त्यांच्याकडे मंत्रिपद होते. नंतर १९९९ च्या दरम्यान शेकापने आघाडी सरकारला पाठिंबा दिल्यानंतर ते सत्तेत आले. ११ वेळा आमदार होऊनसुसुद्धा त्यांच्या डोक्यात आमदारकी गेली नाही म्हणूनच त्यांनी हे शक्य करून दाखविले. पाय जमिनीवर असण्याची कला व साधेपणा या कारणामुळे लोकांनी त्यांना सातत्याने भरघोस मतांनी निवडून दिले.
विरोधी पक्षात राहुनदेखील कामे होऊ शकतात हे गणपतराव देशमुखांनी दाखवून दिले.त्यांनी सहकाराच्या माध्यमातून विकास साधला. त्यासोबतच पाण्यासाठी वेगवेगळ्या स्कीम आणण्यासाठी त्यांनी नेहमी पुढाकार घेतला. मुंबईत असताना सरकारी पातळीवर काम करून घेणं आणि लोकांसोबत आंदोलनात उभं राहणं या दोनही ठिकाणी लोकांनी गणपत आबांना कायमच पाहिलेले आहे.