कवठे – महाराष्ट्राचे शिल्पकार थोर स्वातंत्र्यसेनानी कै. किसन वीर आबा यांचे सुपुत्र तसेच जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते सुरेश किसन वीर यांचे रविवारी पहाटे अल्प आजाराने निधन झाले. जिल्हा परिषदेचे सदस्यपद, जिल्हा बॅंकेचे अध्यक्षपद तसेच जनता शिक्षण संस्थेचे संचालक असा सुरेश वीर यांचा राजकीय प्रवास राहिला आहे.
जिल्हा बॅंकेला नाबार्डचे यशस्वी पुरस्कार खेचून आणण्यात त्यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे.स्वातंत्रसेनानी किसन वीर उर्फ आबा यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सुरेश वीर तसेच कै. लक्ष्मणराव पाटील या जोडगोळीने राजकीय प्रवासाला सुरुवात केली होती. या प्रवासात सहकार व राजकीय विविध संस्थांवर आपली पकड मजुबत करत सातारा जिल्ह्याच्या राजकारणात स्वत:चे वेगळे अस्तित्व निर्माण केले होते. त्यामुळे तात्या व अण्णा राजकीय व सहकार क्षेत्रातील एकाच नाण्याच्या दोन बाजू म्हणून ओळखले जात होते.
सातारा जिल्ह्यावर आपल्या अंगीकृत असलेल्या परखड स्वभावामुळे ते किसन वीर कारखान्याचे चेअरमन झाले. 1988 साली व 2007 साली त्यांनी सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे चेअरमनपद भूषविले. त्यांच्या सहकार क्षेत्रातील कार्यकालामध्ये जिल्ह्याच्या सहकार क्षेत्राला वेगळ्या वळणावर आणून जिल्हा बॅंकेचे नाव देशात अग्रगण्य बॅंक म्हणून त्यांनी नवीन ओळख निर्माण करून दिली होती.
या काळामध्ये त्यांचा सातारा जिल्ह्यातील विविध गावच्या सहकारी संस्थांशी जवळचा संबंध आल्याने त्यांनी भक्कम असे सहकाराचे जाळे उभे केले. बॅंकेच्या पैशाचा सर्वसामान्य शेतकऱ्यांना फायदा व्हावा ही त्यांची नेहमीच तळमळ असायची. शेतकरी हा जगला पाहिजे, त्याच्या कष्टाचे फळ म्हणून त्याला जिल्हा बॅंकेचा आर्थिक आधार देऊन अनेक नवनवीन योजना सुरेश वीर यांनी तयार करून सामान्य माणसाचे प्रपंच उभे केले.
किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे असताना त्यांनी शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या ज्यादा उत्पन्न देणाऱ्या उसाच्या जाती आणून त्या बांधापर्यंत पोहोच केल्या. तर अनेक गावांना शेती पाणीपुरवठा योजनांना चालना दिली होती. कवठे गावातील सर्वच सहकारी संस्था उभ्या करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. सुरेश वीर उर्फ अण्णा हे अल्प आजाराने रुग्णालयात उपचार घेत होते. रविवारी पहाटे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यांच्या जाण्याने जिल्ह्याच्या राजाकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
अण्णांचे पार्थिव कवठे येथे अंत्यदर्शनासाठी आणले असता जिल्ह्यातील राजकीय तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांसह सर्वसामान्यांनी गर्दी केली होती. खा. उदयनराजे भोसले, खा. श्रीनिवास पाटील, आ. मकरंद पाटील, आ. शिवेंद्रराजे भोसले, प्रतापराव भोसले, मदन भोसले, शंकरराव गाढवे, बाळासाहेब सोळस्कर, वाईचे नगराध्यक्ष अनिल सावंत, बाजार समिती चेअरमन लक्ष्मणराव पिसाळ, माजी जि. प. अध्यक्ष शिवाजीराव महाडिक, सद्गुरु शुगरचे उदय जाधव, प्रतापराव पवार, बाबासाहेब कदम, नितीन पाटील, रमेश गायकवाड, अनिल जगताप, महादेव मस्कर, प्रमोद शिदे, जिल्हा बॅंकेचे राजीव गाढवे आदी मान्यवरांनी अंत्यविधीसाठी उपस्थिती लावली होती.