कोलकता :- महाराष्ट्रातील राजकीय महासंकटावर भाष्य करताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरूवारी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले. तसेच, बंडखोर आमदारांना पूरग्रस्त आसामऐवजी बंगालला पाठवा. त्यांचा आम्ही उत्तम पाहुणचार करू. लोकशाहीचीही काळजी घेऊ, अशी उपहासात्मक टिप्पणीही त्यांनी केली.
भाजप अनैतिक आणि घटनाबाह्यरित्या महाराष्ट्र सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहे. राष्ट्रपती निवडणूक जवळ आली असताना ते सरकार अस्थिर करण्याच्या हालचाली मुद्दाम केल्या जात आहेत. महाराष्ट्रातील स्थिती धक्कादायक स्वरूपाची आहे. त्या राज्यातील जनतेला आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना न्याय मिळायला हवा, असे ममता येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या.
महाराष्ट्रातील बंडखोर आमदारांना आसामला पाठवण्यामागे भाजप असल्याची शक्यता त्यांनी वर्तवली. आसामला गंभीर पूरस्थितीने ग्रासले आहे. अशावेळी तेथील सरकारला डिस्टर्ब का करता, असा सवालही त्यांनी भाजपला उद्देशून केला. महाराष्ट्रातील बंडखोर आमदारांनी आसामच्या गुवाहाटीत मुक्काम ठोकला आहे. त्या राज्यात भाजपची सत्ता आहे. त्याचा संदर्भ ममतांनी भाजपला लक्ष्य करताना दिला.