कोलकाता – लोकसभा निवडणुकीचे बंगालमधील वातावरण प्रचंड तापले आहे. या राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ( Mamata Banerjee ) या एकीकडे केंद्रात इंडिया आघाडीचे समर्थन तर करतात. मात्र त्यांनी बंगालमध्ये आघाडीचे घटक पक्ष असलेल्या कॉंग्रेस आणि डाव्या पक्षांसोबत कोणताही जागावाटप करार केलेला नाही. त्या स्वबळावर लढत आहेत.
भारतीय जनता पार्टीच्या विरोधात त्या विशेष आक्रमक आहेत. मात्र त्याचवेळी आता ही आक्रमकता दाखवताना त्या कॉंग्रेस आणि डाव्या पक्षांवरही घसरल्या आहेत. हे पक्ष बंगालमध्ये भारतीय जनता पार्टीचे एजंट म्हणून काम करत असल्याची बोचरी टीका ममता यांनी केली आहे.
मुर्शिदाबाद येथे एका रॅलीत बोलताना त्यांनी कॉंग्रेस आणि डाव्यांवर गंभीर आरोप केला. पडद्यामागे हे पक्ष भाजपला पाठिंबा देत असल्याचा दावा ममतांनी केला. त्या म्हणाल्या की काही लोक असे म्हणतात की आम्ही इंडिया आघाडीत आहोत, आम्हाला पाठिंबा द्या. मात्र इंडिया इथे (प. बंगालमध्ये) नाही. ती केवळ दिल्लीत आहे.
कॉंग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची बंगालमध्ये आघाडी नाही. येथे ते भाजपचे पाठिराखे आहेत. या पक्षांना मत देणे म्हणजे भाजपला मत देण्यासारखे आहे. येणाऱ्या दिवसांत आपण इंडिया आघाडीचे नेतृत्व करणार असल्याचे नमूद करतानाच आपण भाजपचे समर्थन करणाऱ्या पक्षांना आपल्या राज्यात पाठिंबा देणार नाही.