नवी दिल्ली – मणिपूर येथे गेला महिनाभरापेक्षा जास्त काळ हिंसाचार सुरू आहे. त्यावरून सगळ्याच विरोधी पक्षांनी सरकारला घेरले आहे. आता भारतीय जनता पार्टीच्या एका नेत्याने मणिपूर हिंसाचारावर भाष्य करत अमित शहांवर निशाणा साधला आहे. मणिपूर हिंसाचार प्रकरणी बोलताना भाजप नेते डॉ.सुब्रमण्यम स्वामी यांनी पक्षाला सुनावत घरचा आहेर दिला आहे.
राज्यातील सरकार बरखास्त करून तेथे केंद्रीय राजवट लावण्याची मागणी स्वामी यांनी केली आहे. तसेच केंद्रीय गृहममंत्री यांना गृहमंत्रालयाऐवजी क्रीडा मंत्रालयात पाठवावे अशी टिप्पणीही स्वामी यांनी केली आहे. शहा यांनी स्वत: मणिपूरला भेट दिली होती. तसेच स्थिती आटोक्यात येत असल्याचा दावा सरकारकडून केला जात असताना हिंसाचाराने पुन्हा डोके वर काढले आहे.
काल तर केंद्रीय मंत्र्याच्या घरालाच तेथील समाजकंटकांनी आग लावल्याची घटना घडली आहे. या धक्कादायक प्रकारानंतर आता स्वामी यांनीही सरकारला सुनावले आहे. मणिपूरमध्ये केंद्रीय राजवट लागू करण्याची वेळ आली असल्याचे रोखठोक मत स्वामींनी व्यक्त केले.
मणिपूरमधील गंभीर हिंसाचारावर केंद्र सरकारच्या हस्तक्षेपाची मागणी करणाऱ्या काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विदेश दौऱ्यावर जाण्यापूर्वी राज्यातील 10 विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या शिष्टमंडळाला भेटण्यासाठी वेळ देण्याची विनंती केली आहे.पंतप्रधान मोदींनी पुढाकार घेतल्यास दिढ महिन्यांपासून सुरु असलेला मणिपूरमध्ये हिंसाचार थांबू शकेल असं यावेळी त्यांनी म्हंटल आहे.