नवी दिल्ली- भारताचे नेतृत्व सुभाषचंद्र बोस यांच्या हाती असते तर भारताची फाळणी कधीच झाली नसती, असे मत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी मांडले आहे. पाकिस्तानचे निर्माता मोहम्मद अली जिना यांनीही सुभाषचंद्र बोस या एकमेव व्यक्तीलाच आपण नेता म्हणून स्वीकारू शकतो असे वक्तव्य केल्याचेही डोवाल यांनी सांगितले.
नेताजी सुभाषचंद्र बोस मेमोरियल लेक्चर या कार्यक्रमात डोवाल बोलत होते. नेताजी सुभाषचंद्र बोस हे अत्यंत धार्मिक व्यक्तिमत्व होते, ते एकमेव नेते होते ज्यांच्यात महात्मा गांधींना आव्हान देण्याची क्षमता होती, तसेच त्यांनी स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांसमोर कधीही भीक मागितली नसल्याचेही डोवाल यांनी यावेळी म्हटले.
सुभाषचंद्र बोस यांच्यावर इतिहासाने अन्याय केला आहे. सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या इतिहासाचे पुनर्लेखनाला पाठिंबा दिल्याने आपण आनंदी आहोत. 1962 साली आपल्या देशाची युद्धाची कोणतीही तयारी नव्हती, त्यामुळे आपल्याला पराभव पत्करावा लागला, असेही डोवाल यांनी पुुढे म्हटले.