सीतारामन : भारताचा विकासदर लवकरच येणार पूर्वपदावर
नवी दिल्ली – लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था ज्या वेगाने घसरली त्याच वेगाने ती वाढेल, असा दावा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. अर्थव्यवस्था घसरत असताना ती वाढावी याकरिता केंद्र सरकारने काळजीपूर्वक आत्मनिर्भर धोरण जाहीर करून त्याची अंमलबजावणी केल्यामुळे विकासदर वेगात वाढण्यास मदत होणार असल्याचे सीतारामन यांना वाटते.
वेबिनारच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय नाणेनिधी बैठकीला संबोधित करताना सीतारामन म्हणाल्या की, भारताचे अर्थव्यवस्था इंग्रजी व्ही आकाराची प्रमाणे कमी झाल्यानंतर वेगाने वाढेल. लॉकडाऊनमुळे अनेक गरीब देशातील गरिबांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. भारताने 30 लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करून त्यातील बराच भाग गरिबांना उपलब्ध केला आहे.
भारताची अर्थव्यवस्था व्ही आकाराप्रमाणे मार्गक्रमण करेल. असे सांगताना त्या म्हणाल्या की, मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राचा पर्चेसिंग मॅनेजर इंडेक्स आठ वर्षाच्या उच्चांकी पातळीवर गेला आहे. सेवाक्षेत्राचा निर्देशांकही वाढत आहे. वाहन विक्री वाढली आहे. त्याचबरोबर ग्राहकांकडून उत्सवांच्या काळात खरेदी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अर्थव्यवस्था पूर्वपदावर वेगाने येणार आहे.
भारताची अर्थव्यवस्था इतर देशांच्या तुलनेत लवकर वेग घेणार असल्याचे बऱ्याच पतमूल्यांकन संस्थानी म्हटले आहे. पहिल्या तिमाहीत विकास दर कोसळला असला तरी नंतरच्या तिमाहीत परिस्थिती वेगाने सुधारत आहे. त्यामुळे चौथ्या तिमाहीती अर्थव्यवस्थेवरील करोनाचा प्रभाव पूर्णपणे संपलेला असेल, असे त्या म्हणाल्या.
वित्तीय स्थिती मजबूत
भारतात महागाई वाढली आहे. मात्र, आगामी काळामध्ये महागाई वाढणार नाही यासाठी रिझर्व्ह बॅंकेने आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत. त्याचबरोबर केंद्र सरकारने विचारपूर्वक आवश्यक तेवढे कर्ज घेण्याचा निर्धार केलेला आहे. त्यामुळे भारताची वित्तीय परिस्थिती मजबूत राहणार आहेत. त्याचा आगामी काळातील अर्थव्यवस्थेला लाभ होईल, असे सीतारामन यांनी सांगितले.