नगर – बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल…. असे विठ्ठलाचे अभंग, भक्तिगीते गात शहरातून पालख्या पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहेत. डोईवर तुळशी वृंदावन, हातात टाळ चिपळ्या, कपाळी गंध, मुखामध्ये विठू नामाचा गजर हे दृश्य सध्या शहरात सर्वत्र पाहायला मिळते. दरवर्षी नगर जिल्ह्यातून 260 दिंड्या पंढरपूर कडे रवाना होतात. ताहराबाद येथील महिपती महाराज दिंडी, नेवासा येथील संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज दिंडी, श्री संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान दिंडी, देवगिरीची श्री संत जनार्दन महाराज दिंडी, श्रीक्षेत्र कनेरी येथील जिव्हेश्वर महादेव रथ दिंडी तसेच महीपती महाराज दिंडी आदी विविध दिंड्या मधून पंढरपूर कडे मार्गस्थ झाल्या.
विविध स्वयंसेवी संस्था व संघटनांनी तसेच राजकीय पुढाऱ्यांनी या दिंड्यांचे शहरात स्वागत केले.काही ठिकाणी रांगोळ्या काढण्यात आल्या तर काही ठिकाणी कमानी उभारण्यात आल्या. वारकऱ्यांच्या निवासाची आणि भोजनाची सोय केली. मुक्कामी दिंडीत रात्री प्रवचन आणि कीर्तनही केले जाते. त्याला स्थानिक भक्तगण हजेरी लावतात. विठ्ठल दर्शनासाठी आसुसलेले वारकरी उन्हपावसाची तमा न बाळगता दिंडीत सामील होतात.
मागील 36 वर्षांपासून भानुदास कोतकर यांच्या मार्गदर्शनाखाली केडगाव येथून श्री भैरवनाथ पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन केले जाते. सचिन कोतकर व सौ. वैशाली कोतकर यांच्या हस्ते पूजा झाल्यानंतर दिंडीने पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. यावेळी दिंडीप्रमुख रामदास क्षीरसागर महाराज, जालिंदर कोतकर, सुनील कोतकर, बबन मेहेत्रे उपस्थित होते. माजी महापौर संदीप कोतकर या दिंडीची व्यवस्था पाहतात.
दिंडीद्वारे प्लॅस्टिकमुक्तीचा संदेश
पर्जन्यमानाचा तुटवटा, वाढलेले प्रदुषण यांवर उपाययोजना हा संदेश देत येथील वैष्णव सेवा भक्त मंडळाची दिंडी पंढरपूरकडे रवाना झाली. वारी काळात दिंडी चालक माजी नगरसेवक सुनील त्रिपाठी, सुनिल दातरंगे, अनंत द्रविड आपल्या सहकाऱ्यांसह गावोगावी जागर, किर्तन, भारूड, प्रवचनाच्या माध्यामातून प्रबोधन करत आहेत.