मंचर शहरात भूमिपूजन
मंचर – गेल्या लोकसभा निवडणुकीत शिरूर लोकसभा मतदारसंघातून जनतेने भावनेच्या भरात डॉ. अमोल कोल्हे यांना निवडून दिले. मात्र ते मतदार संघात फिरत नाहीत. त्यांना मतदारांची पर्वा नाही. खासदार नसतानाही माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील गेली चार वर्षे मतदारसंघात फिरत असून विविध विकासकामे मार्गी लावत आहेत. या पुढील काळात जनतेसाठी काम करणाऱ्या माणसाला निवडून द्या, असे आवाहन आमदार शहाजी बापू पाटील यांनी केले.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रयत्नातून मंचर शहराच्या विकासकामासाठी 26 कोटींच्या विकासकामांचा भूमिपूजन समारंभ पार पडला. त्यानंतर झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.
यावेळी शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार शरद सोनवणे, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख सुनील बाणखेले, भाजपचे संपर्क प्रमुख जयसिंगराव एरंडे, भाजपचे तालुका प्रमुख डॉ. ताराचंद कराळे, तालुका प्रमुख अरुण गिरे, भैरवनाथ पतसंस्थेचे उपाध्यक्ष सागर काजळे, योगेश बाणखेले, रवींद्र करंजखेले, स्वप्नील बेंडे, रामशेठ तोडकर, प्रवीण थोरात पाटील, संदीप बाणखेले, प्रमोद बाणखेले, कल्पेश बाणखेले, महेश ढमढेरे, सुशांत थोरात, मालती थोरात, जागृती महाजन, रुपाली घोलप उपस्थित होते.
पाटील म्हणाले, शिवाजीराव आढळराव पाटील हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जवळचे सहकारी आहेत. शिरूर लोकसभेचा विकास करायचा असेल तर आढळराव पाटील यांच्याशिवाय पर्याय नाही.
आढळराव पाटील म्हणाले खासदारकीच्या तिकिटासाठी जनतेची कामे करत नसून मला जनतेत राहून काम करायला आवडते. माझ्या तिकिटाबाबतचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडवणीस घेतील. महाविकास आघाडीचे सरकार असताना मतदारसंघात निधी आणण्यासाठी त्रास सहन केला होता. सूत्रसंचालन अजित चव्हाण यांनी तर सुशांत थोरात यांनी आभार मानले.
… तर पुढची
यावेळी शहाजी पाटील यांनी माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना थेट आव्हान दिले. ते म्हणाले, माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ते आमदार झाल्यापासून आजतागायत या मतदारसंघासाठी जेवढा निधी आणला आहे तो सर्व निधी एकत्र करून त्याची बेरीज करा आणि मी चार वर्षात माझ्या तालुक्यासाठी आणलेला निधीची बेरीज करा. मी आणलेला निधी हा वळसे पाटील यांच्या निधीपेक्षा दुप्पट आहे. माझा निधी कमी भरला तर या पुढची आमदारकी लढणार नाही.