पुणे – राज्यातील शेतकऱ्यांच्या विकासात भूविकास बॅंकेचे योगदान मोलाचे आहे. आपल्या पूर्वजांनी स्थापन केलेली, आपण सर्वांनी वाढवलेली, भूविकास बॅंक अवसायनात निघाल्यानं बंद करावी, लागली याचे निश्चितच दु:ख आहे, अशी भावनिक प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केली.
अल्पबचत भवनमध्ये भूविकास बॅंक अवसायनात निघाल्याने अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि बॅंक कर्मचाऱ्यांना त्यांची थकीत देणी देण्याचा निर्णय घेऊन, निर्णयाची अंमलबजावणी केल्याबद्दल तत्कालीन अर्थमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा सत्कार शेतकरी व भूविकास बॅंकेच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी आयोजित कृतज्ञता मेळाव्यात सत्काराला उत्तर देताना विरोधी पक्षनेते पवार बोलत होते. यावेळी माजी खासदार आनंदराव आडसुळ, कॅप्टन अभिजीत अडसूळ, सुनील साळवी, नरेंद्र सावंत, नितीन खोडदे, एम. पी. पाटील, आनंद थलवर उपस्थित होते. राज्यातल्या 34 हजार 788 कर्जदार शेतकऱ्यांकडील सुमारे 964 कोटी 15 लाख रुपयांचे कर्ज माफ करण्यात आल्याचे पवार यांनी सांगितले.